धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बिलोलीत तहसीलवर धडक मोर्चा
आधुनिक केसरी न्यूज
दिलीप घाटे
बिलोली : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा घटनात्मक हक्क असून, शासनाने या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी बिलोली तालुका धनगर समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सभापती निवासस्थानापासून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभाग अधिकारी कार्यालयातील तहसीलदार रघुवीरसिह चौव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आले.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, घटनात्मक तरतुदीनुसार मिळणाऱ्या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने आता ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. केवळ आश्वासने आणि चर्चेपुरता हा प्रश्न न ठेवता धनगर समाजाच्या मागणीवर शासनाने निर्णायक पाऊल उचलावे, अशी भावना मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली. यासोबतच हुतात्मा वीर शिग्रोबा धनगर यांच्या नावाने कनेक्टिंग नामकरण करावे, चर्चगेट रेल्वे स्थानकाला राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, तसेच श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा, अशा मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
मोर्चामध्ये धनगर समाजातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहून त्यांची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चात मारोती राहिरे, शंकर काळे, शंकर परसुरे, लक्ष्मण होरके, प्रभाकर पेंटे, अरविंद पेंटे, विठ्ठल माने, गंगाधर प्यादेकर, शिवाजी तुकडे, सुरेश वानोळे, बाळासाहेब चट्टे, आकाश कोकणे, लक्ष्मण कोकणे, ज्ञानेश्वर दामेकर, हनुमंत बळके, ज्ञानेश्वर सांगनाळे, साईनाथ छप्पेवार, ऋतुराज जिंकले आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बाळासाहेब लक्ष्मण रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्ताची व्यवस्था केली. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा केवळ राजकीय मागणीचा विषय नसून आपल्या घटनात्मक हक्काच्या अंमलबजावणीचा प्रश्न आहे, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शासन आता या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे धनगर समाजाचे लक्ष लागले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List