निपाणी सावरगाव येथे स्मशानभूमीच्या जागेसाठी २९ ऑगस्ट रोजी ‘प्रतीकात्मक सरण रचून’ आमरण उपोषणाचा इशारा
आधुनिक केसरी न्यूज
माणिक सुर्यवंशी
देगलूर : तालुक्यातील मौजे निपाणी सावरगाव येथे नागरिकांच्या अंत्यसंस्कारासाठी हक्काची व कायमस्वरूपी सार्वजनिक स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी प्रशासनाकडून सातत्याने होणाऱ्या दिरंगाईविरोधात आता तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. स्मशानभूमीच्या जागेचा प्रत्यक्ष ताबा व ७/१२ उताऱ्यावर नोंद न झाल्यास येत्या शनिवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी निपाणी सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर ‘प्रतीकात्मक सरण रचून आमरण उपोषण’ करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते आकाश दत्ता पाटील कोकणे यांनी दिला आहे. याबाबतचे अंतिम निवेदन उपविभागीय अधिकारी (SDO) देगलूर यांना देण्यात आले आहे.
नेमके प्रकरण काय?
निपाणी सावरगाव येथे अंत्यसंस्कारासाठी हक्काची जागा नसल्याने ग्रामस्थांना अत्यंत गंभीर, क्लेशदायक व मूलभूत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते आकाश पाटील कोकणे हे मागील दीड ते दोन वर्षांपासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या प्रकरणात पंचायत समिती व तहसील स्तरावर पत्रव्यवहार होऊन खाजगी जमीन संपादनाचा प्रस्तावही पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे आजतागायत स्मशानभूमीची जागा प्रत्यक्षात ताब्यात मिळालेली नाही, तसेच ७/१२ उताऱ्यावर आवश्यक नोंद वा अंतिम आदेशही निघालेला नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
प्रमुख मागण्या:
मौजे निपाणी सावरगाव येथे सार्वजनिक स्मशानभूमीसाठी कायमस्वरूपी जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी.
संबंधित जागेची तात्काळ मोजणी, सीमांकन आणि महसूल नोंदी पूर्ण करण्यात याव्यात. जागेची ७/१२ उताऱ्यावर अधिकृत नोंद करून अंतिम आदेश निर्गमित करावा.खाजगी जमीन संपादनाच्या प्रस्तावावर नियमानुसार तातडीने अंतिम कार्यवाही व्हावी. ग्रामस्थांना स्मशानभूमीची जागा प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने स्पष्ट लेखी आदेश द्यावा.
यापूर्वीच्या पत्रव्यवहारानुसार प्रलंबित कामांची निश्चित कालमर्यादा (Time Limit) जाहीर करावी.
शांततामय मार्गाने आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने २९ ऑगस्टपूर्वी यावर ठोस व लेखी कार्यवाही न केल्यास शांततामय व लोकशाही मार्गाने उपोषण सुरू केले जाईल. हे आंदोलन कोणत्याही हिंसेसाठी नसून केवळ प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘प्रतीकात्मक सरण’ रचून निषेध व्यक्त केला जाणार आहे, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार देगलूर, गटविकास अधिकारी (पं.स. देगलूर), पोलीस निरीक्षक (पोलीस स्टेशन देगलूर), मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. नांदेड) तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती व आवश्यक सुरक्षा व्यवस्थेसाठी सादर करण्यात आल्या आहेत.
"एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी जागेची भटकंती करावी लागणे हे पुरोगामी महाराष्ट्रात अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या दोन वर्षांपासून केवळ कागदी पत्रव्यवहार सुरू असून जमिनीवर काहीही कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाने २९ ऑगस्टपूर्वी ठोस निर्णय न घेतल्यास ग्रामपंचायत समोर प्रतीकात्मक सरणावर बसून आमरण उपोषण करणारच!" आकाश दत्ता पाटील कोकणे (सामाजिक कार्यकर्ते, निपाणी सावरगाव)
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List