म्हसवडमध्ये तरसांचा वावर; शेतकरी भयभीत, वनविभाग मात्र ‘कुंभकर्णी’ झोपेत!
आधुनिक केसरी न्यूज
सचिन सरतापे
म्हसवड : म्हसवड–माळशिरस रोडवरील श्रीनाथ धाब्याच्या मागील भागातील शेतशिवार परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस जातीच्या वन्यप्राण्यांचा वावर असल्याची माहिती समोर आली असून, यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हालचाली जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणे, जनावरांची देखभाल करणे आणि पिकांच्या संरक्षणासाठी शेतात थांबणेही धोकादायक ठरत आहे. वन्यप्राण्यांचा वावर वाढत असताना एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.
वनविभाग नेमका कोणत्या दुर्घटनेची वाट पाहतोय?
परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याची चर्चा सुरू असतानाही वनविभागाकडून तातडीने पाहणी, पंचनामा, कॅमेरा ट्रॅप किंवा आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. वन्यप्राण्यांचा वावर गंभीरपणे घेऊन वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. माणसाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानंतर प्रशासन धावपळ करण्यापेक्षा त्याआधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. तरसांचा वावर नेमका किती प्रमाणात आहे, त्यांची संख्या किती आहे आणि ते कोणत्या भागात फिरत आहेत, याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने तातडीने पथक पाठवावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
शेतकऱ्यांमध्ये दहशत; प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी
शेतकरी आधीच विविध संकटांनी त्रस्त असताना आता वन्यप्राण्यांच्या वावरामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने झोपेचे सोंग सोडून प्रत्यक्ष शेतशिवारात उतरावे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, नागरिकांनीही रात्रीच्या वेळी एकट्याने शेताकडे जाणे टाळावे आणि वन्यप्राण्यांचा संशयास्पद वावर दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
एखादी जीवितहानी होण्यापूर्वीच वनविभागाने जागे व्हावे, अन्यथा शेतकऱ्यांचा संताप उफाळून आल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List