भोकरदनात तिरंग्याचा महासागर; १ किलोमीटरची अखंड तिरंगा पट ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू..!
आधुनिक केसरी न्यूज
अमोल शिंदे
भोकरदन : दि. १४ ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भोकरदन शहर आज तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाले. केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नगरपरिषद भोकरदन व न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीने शहराचे लक्ष वेधून घेतले. तब्बल एक किलोमीटर लांबीची अखंड तिरंगा पट हे या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले.न्यू हायस्कूलच्या नवीन इमारतीपासून रॅलीला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला.भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘हर घर तिरंगा—हर मन तिरंगा’ अशा घोषणांनी संपूर्ण शहरात देशभक्तीचा उत्साह संचारला.रॅली महात्मा फुले चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गे नगरपरिषद कार्यालयापर्यंत पोहोचली. मार्गावर नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. हजारो तिरंग्यांनी सजलेले रस्ते, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि देशभक्तीपर घोषणांमुळे भोकरदनमध्ये जणू तिरंग्याचा महासागरच लोटला होता.यंदा ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने अभियानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर १४ ऑगस्ट रोजी पाळण्यात येणाऱ्या फाळणी भयावह स्मृती दिनाच्या पार्श्वभूमीवर रॅलीतून राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला.रॅलीस नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, नगरसेवक गण, मुख्याधिकारी, नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी, न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.तिरंगा हातात अन् देशभक्ती मनात अशा उत्स्फूर्त वातावरणात पार पडलेल्या या रॅलीने भोकरदनच्या राष्ट्रप्रेमाची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. प्रत्येक घरावर तिरंगा आणि प्रत्येक मनात राष्ट्रभक्तीचा संदेश देत रॅलीचा समारोप करण्यात आला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List