भोकरदनच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी’ची गस्त, पोलीस चौकी अन् CCTVची मागणी;अनिता जाधव आक्रमक
आधुनिक केसरी न्यूज
भोकरदन : दि. १२ ऑगस्ट शाळेत जायचं शिकायचं स्वप्नं उराशी बाळगायची; पण वाटेत छेडछाडीची भीती असेल तर मुलींच्या शिक्षणाला अर्थ काय? भोकरदन शहर व तालुक्यातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आता केवळ आश्वासन नव्हे, तर ठोस पोलीस व्यवस्था उभी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रा. अनिता अंकुश जाधव यांनी केली.जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले.बसस्थानकातील पोलीस चौकी पूर्ण क्षमतेने सुरू करा, दामिनी पथकाची नियमित गस्त वाढवा आणि प्रमुख चौकांसह शाळा-महाविद्यालय परिसरात CCTVचे सुरक्षा कवच उभारा,अशी मागणी करण्यात आली.मागील वर्षी छेडछाडीच्या घटनांनंतर वाढविण्यात आलेली पोलिसांची गस्त आता कमी झाल्याने पुन्हा प्रतिबंधात्मक व्यवस्था मजबूत करण्याची गरज असल्याचे जाधव यांनी म्हटले.
चौकीला कुलूप नको
बसस्थानकात पोलीस चौकी उभारण्यात आली असली तरी ती केवळ नावापुरती न राहता पूर्ण क्षमतेने कार्यरत असावी,अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.श्रेय कोणाचेही असो;भोकरदनच्या मुली सुरक्षित असल्या पाहिजेत.मुलींच्या सुरक्षेसाठी उभारलेली पोलीस चौकी कुलूपबंद ठेवू नका शाळा-महाविद्यालय सुरू व सुटण्याच्या वेळेत विशेष गस्त,संवेदनशील मार्गांवर बंदोबस्त आणि टवाळखोरांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
सुरक्षेवर राजकारण नको
मुलगी सुरक्षित असेल तरच ती शिकेल.मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न राजकीय श्रेयाचा नाही;तो समाजाच्या भविष्याचा प्रश्न आहे.श्रेयासाठी आमच्याशी स्पर्धा करू नका,मुलींच्या सुरक्षिततेसाठी आमच्यासोबत स्पर्धा करा,असा घणाघाती सवाल अनिता जाधव यांनी केला.दरम्यान, पोलीस अधीक्षक संधू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बसस्थानकातील पोलीस चौकी तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून,दामिनी पथकाची नियमित गस्त सुरू करण्याचेही स्पष्ट केले. आता या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावी होते,याकडे पालक व विद्यार्थिनींचे लक्ष लागले आहे.पोलीस चौकी सुरू करा दामिनीची गस्त वाढवा आणि भोकरदनच्या मुलींना निर्भय वातावरण द्या अशी ठाम मागणी जाधव यांनी केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List