राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या शेजारी बिअर बार अन् देशी दारूचे दुकान; पिढी घडविणाऱ्या परिसराचे नियोजन नेमके कोणाचे
आधुनिक केसरी न्यूज
अमोल शिंदे
भोकरदन : एका बाजूला विद्यार्थिनींसाठी शिक्षणाचे मंदिर उभे राहतेय...नवीन पिढी घडविण्याचे स्वप्न पाहिले जातेय; आणि दुसऱ्या बाजूला याच महाविद्यालयाच्या अगदी शेजारी गेल्या चार-पाच वर्षांपासून बिअर बार आणि देशी दारूचे अधिकृत दुकान आहे.यामुळे शिक्षण आणि व्यसनाच्या या विरोधाभासी चित्राने आता परिसर नियोजन आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.महाविद्यालय म्हणजे केवळ चार भिंतींची इमारत नव्हे; ते विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देणारे आणि भवितव्य घडविणारे केंद्र असते.मग अशा शिक्षणसंस्थेच्या शेजारीच मद्यविक्रीची दुकाने असतील,तर या परिसराच्या नियोजनाचा विचार नेमका कोणी केला.दारूची दुकाने अधिकृत असतील... मग नियम काय सांगतात.शेजारील बिअर बार आणि देशी दारूचे दुकान अधिकृत असल्याचे सांगितले जात असेल,तर त्यांना परवानगी देताना शैक्षणिक संस्थांपासूनचे अंतर,स्थानिक परिस्थिती आणि उत्पादन शुल्क विभागाचे लागू नियम तपासले गेले होते का,हा प्रश्न उपस्थित होत आहे. परवानगी दिली असेल तर कोणत्या नियमांच्या आधारे व अंतराची अट असेल तर तिचे पालन झाले आहे का,परिसराची पाहणी कोणी केली,आणि शैक्षणिक संस्था सुरू झाल्यानंतरही ही व्यवस्था कायम ठेवण्यास कोणाची मंजुरी आहे.या प्रश्नांची उत्तरे संबंधित विभागांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे.
पिढी घडवायची का व्यसनाच्या सावलीत...
पालक आपल्या मुलींना चांगले शिक्षण,संस्कार आणि सुरक्षित वातावरण मिळावे म्हणून महाविद्यालयात पाठवतात.अशा वेळी महाविद्यालयाच्या परिसरातच मद्यविक्रीची दुकाने असणे हा केवळ परवानगीचा विषय राहत नाही; तो विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि आरोग्यदायी शैक्षणिक वातावरणाचाही प्रश्न बनतो.शिक्षणसंस्था उभी करताना तिच्या आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाचा विचार होणे अपेक्षित आहे.एकीकडे ‘नवीन पिढी घडविण्याची’ भाषा आणि दुसरीकडे त्याच पिढीच्या शिक्षणस्थळाच्या शेजारी मद्यविक्री हा विरोधाभास प्रशासनाच्या लक्षात का नाही आला.असा प्रश्न सर्वसामान्य पडला आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जागे होणार कधी?
या प्रकरणात कोणतेही दुकान नियमबाह्य असल्याचा निष्कर्ष काढण्यापूर्वी संबंधित परवानग्या,अंतराच्या अटी आणि लागू शासन नियमांची अधिकृत तपासणी झाली पाहिजे.उत्पादन शुल्क विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नियमांची पूर्तता झाली आहे का,हे स्पष्ट करावे.स्थानिक प्रशासनानेही महाविद्यालयाच्या परिसरातील नियोजनाबाबत भूमिका स्पष्ट करावी.कारण प्रश्न दारूच्या दुकानाचा एवढाच नाही.प्रश्न आहे शिक्षणाच्या मंदिराभोवतीचे वातावरण कसे असावे,याचा निर्णय कोण घेणार.
ज्ञानाच्या मंदिराभोवती व्यसनाची सावली नको...
महाविद्यालय उभे राहणे ही निश्चितच चांगली बाब आहे.मात्र विद्यार्थिनींच्या शिक्षणासोबत त्यांना सुरक्षित,सकारात्मक आणि शैक्षणिक वातावरण मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.म्हणूनच प्रशासनाने कागदपत्रे तपासावीत,नियम स्पष्ट करावेत आणि जर कुठे नियमभंग आढळला तर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी.नवीन पिढी घडविणाऱ्या शिक्षणसंस्थेच्या दाराशी व्यसनाची सावली किती योग्य हा प्रश्न आता केवळ पालकांचा नाही..तो प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनीही स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List