कर्ज फेडतोय, व्याज परताव्याची वाट पाहतोय!
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या हजारो लाभार्थ्यांचा आक्रोश; प्रलंबित व्याज परताव्यासाठी तातडीने निधी द्या, नरेंद्र पाटील यांना निवेदन
आधुनिक केसरी न्यूज
अमोल शिंदे
भोकरदन : व्यवसाय उभारण्याचे स्वप्न घेऊन कर्ज घेतले;कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी धडपड सुरू आहे... मात्र शासनाकडून मिळणारा व्याज परतावाच रखडल्याने लाभार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत कर्ज घेतलेल्या हजारो लाभार्थ्यांना प्रलंबित व्याज परतावा तात्काळ देण्यात यावा,यासाठी आता लाभार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.याबाबत महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना विकास जाधव,नारायण लोखंडे, गोकुळ सपकाळ आणि राहुल साबळे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.प्रलंबित व्याज परताव्यासाठी तातडीने पुरेसा निधी उपलब्ध करून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी,अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
कर्ज घेतले उद्योगासाठी;परताव्यासाठी करावी लागतेय कसरत..!
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.या योजनेच्या आधारावर अनेक तरुणांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला असून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र,कर्जाचे हप्ते, व्यवसायाचा खर्च आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळताना व्याज परतावा वेळेवर न मिळाल्याने लाभार्थ्यांवरील आर्थिक ताण वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शासनाकडून मिळणारा व्याज परतावा हा लाभार्थ्यांसाठी मोठा आधार ठरतो. त्यामुळे हा परतावा रखडल्यास कर्जाचा प्रत्यक्ष आर्थिक भार वाढतो.यामुळे व्यवसाय उभा करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना तरुणांची आर्थिक कोंडी होत असल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
LOI आहे... तरी लाभापासून वंचित का?
निवेदनात 2024-25 या कालावधीतील LOI पात्रता पत्र मिळालेल्या लाभार्थ्यांचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पात्रता असूनही अनेक लाभार्थ्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.काही पात्र लाभार्थ्यांचे LOI प्रमाणपत्र डिलीट झाल्याने त्यांच्यासमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे LOI प्रमाणपत्र असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे तपासून त्यांना योजनेचा लाभ तातडीने देण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली.
योजना कागदावर नाही, तरुणांच्या हातात उद्योग हवा!
तरुणांना कर्जाच्या माध्यमातून उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे हा महामंडळाच्या योजनेचा उद्देश आहे. मात्र, कर्ज मिळाल्यानंतर व्याज परताव्यासाठी लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत असेल, तर योजनेच्या अंमलबजावणीचा अपेक्षित फायदा लाभार्थ्यांना पूर्णपणे मिळणार कसा? असा सवाल उपस्थित होत आहे.त्यामुळे शासन व महामंडळाने प्रलंबित व्याज परताव्याचा तातडीने निपटारा करावा,आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा आणि LOI पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे मार्गी लावावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.तरुणांना उद्योगासाठी कर्ज मिळते; मात्र व्याज परतावा वेळेवर मिळाला नाही तर कर्जाचा आर्थिक ताण वाढतो.शासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन लाभार्थ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी विकास जाधव, नारायण लोखंडे, गोकुळ सपकाळ, राहुल साबळे आदी उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List