‘रघुपती राघव’च्या तालावर सरकारला सवाल..!
भोकरदनमध्ये काँग्रेसचा जनतेच्या प्रश्नांसाठी एल्गार
आधुनिक केसरी न्यूज
अमोल शिंदे
भोकरदन : भजन-कीर्तनाचा सूर हातात जनतेचे प्रश्न... आणि सरकारच्या धोरणांविरोधात संतप्त घोषणा! भोकरदन येथे शनिवारी काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘रघुपती राघव राजाराम’ आंदोलनाने शहराचे लक्ष वेधून घेतले. शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारत काँग्रेसने जनआक्रोशाचा आवाज बुलंद केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दक्षिणमुखी मारुती मंदिर परिसर, पोस्ट ऑफिसजवळ आंदोलन व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्याचे खासदार कल्याणरावजी काळे, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर तालुकाध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
कार्यक्रमाची सुरुवात भजन-कीर्तनाने झाली. त्यानंतर श्रीरामाची आरती करण्यात आली. मात्र धार्मिक वातावरणातूनच काँग्रेसने जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला.
‘यादीत नाव असूनही कर्जमाफी कुठे?’
शेतकरी कर्जमाफीच्या यादीतील त्रुटींमुळे अनेक शेतकरी अडचणीत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्रुटी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. पीककर्ज मिळविताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करून बँकिंग यंत्रणेला स्पष्ट निर्देश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली.
लाडकी बहीण योजनेवरही प्रश्नचिन्ह
लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची चौकशी करून पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, अशी भूमिका काँग्रेसने मांडली. योजनेच्या नावावर पात्र महिलांवर अन्याय होऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
NEET पेपरफुटीचा मुद्दा तापला
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित NEET-UG पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही आंदोलनातून करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी खेळ करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला पाठीशी घालू नये, असा सूर कार्यकर्त्यांच्या घोषणांमधून उमटला.
आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सरकारने केवळ आश्वासनांवर न थांबता ठोस आणि तातडीचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांवर अधिक आक्रमकपणे आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे, तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बदर चाऊस, रऊफ परसुवाले, रहीम तांबोळी, सुरेश गवळी, राजाभाऊ कुलकर्णी, अशोक उबाळे, शांतीलाल बनसोडे, अनिल देशपांडे, भाऊसाहेब सोळंके, त्रिंबक आप्पा पाबळे, अब्दुल सत्तार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जनतेचा आवाज दाबता येणार नाही; शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील,’ असा निर्धार यावेळी करण्यात आला
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List