आश्चर्य दुष्काळातही भगवानगडाच्या पायथ्याशी विहीर तुडुंब!
आधुनिक केसरी न्यूज
त्रिसिंग जायभाये
अंबड/शेवगाव : भगवानगडाच्या पायथ्याशी नागलवाडी-बोधेगाव रस्त्यालगत डोंगराच्या कुशीत असलेल्या विहिरीने सध्या परिसराचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तलाव, बंधारे तसेच अनेक विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत असताना या विहिरीची पाणीपातळी मात्र कमी होण्याऐवजी कायम राहून वाढत असल्याचे दिसून येत असल्याची माहिती बाळासाहेब ढाकणे (शेवगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन) अरुण ढाकणे यांनी दिली आहे. तो एक चर्चेचा विषय बनला आहे.
भगवानगडावर संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे बांधकाम अत्यंत वेगाने सुरू आहे. तसेच येथे अखंडपणे २४ तास अन्नदान सुरू असून, भाविकांना पिण्यासाठी व गडावरील गोशाळेतील गोधनासाठीही मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असते. या सर्व कामांसाठी याच विहिरीतील पाण्याचा वापर केला जातो आहे. सातत्याने पाण्याचा उपसा होत असतानाही विहिरीतील पाण्याची पातळी टिकून असून पाणीपातळी वाढत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या विहिरीतील पाणीपातळी वाढल्याची माहिती सोशल मीडिया तसेच परिसरात पसरताच अनेक नागरिकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात एकीकडे पावसाने पाठ फिरवल्याने परिसरातील जलस्रोत आटत असताना खरीपातील पिके पुरेसा पाऊस न झाल्याने जळून चालली आहेत. मात्र डोंगराच्या कुशीत असलेल्या या विहिरीत मात्र मुबलक पाणीसाठा कायम टिकून आहे. यामुळे ही भगवानगडाला निसर्गाची अनोखी साथ असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
विशेष म्हणजे, या विहिरीपासून अवघ्या दीडशे फुटांवर नागलवाडी येथील शेतकरी बबनराव ढाकणे यांची खासगी विहीर आहे. मात्र, या विहिरीतील पाणीसाठा अत्यल्प असून ती जवळपास कोरडी ठाक झाली आहे. एकाच परिसरात आणि अवघ्या दीडशे फुटांच्या अंतरावर असलेल्या दोन विहिरींच्या पाणीपातळीत एवढी मोठी तफावत असल्याने हा विषय सध्या परिसरात कुतूहलाचा ठरला आहे.
भगवानगडावर संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर बांधकाम, २४ तास सुरू असलेले अन्नदान तसेच गोशाळेतील गोधनासाठी सातत्याने पाण्याचा वापर होत असतानाही या विहिरीतील पाणीसाठा कमी नसल्याने भाविकांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे.
भगवानगडाचे संत भगवानबाबांशी असलेले आध्यात्मिक नाते सर्वश्रुत आहे. संत भगवानबाबांनी पाण्यावर गाथा वाचन केल्याची परंपराही सांगितली जाते. त्यामुळे या परिसरात विहिरीतील पाणी टिकून राहणे ही संत भगवानबाबांची कृपा व निसर्गाची साथ असल्याची भावना अनेक भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.
या विहिरीला पाण्याचा नैसर्गिक स्रोत नेमका कोणता आहे, याचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास झाल्यास पाणीपातळी कायम राहण्यामागील कारण स्पष्ट होऊ शकते. सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीत परिसरातील जलस्रोतांची पाणीपातळी खालावत असताना भगवानगडाच्या पायथ्याशी असलेली ही विहीर मात्र तुडुंब आहे. पावसाची प्रतीक्षा असतानाही या विहिरीने भगवानगडावरील ज्ञानेश्वर मंदिराचे बांधकाम, दररोजचे अन्नदान आणि गडावरील गोधनासाठी पाण्याचा मोठा आधार दिला आहे. त्यामुळे या विहिरीची निसर्गाची साथ सध्या नागलवाडी परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
‘साधुसंतांच्या कृपेने कोणतीच गोष्ट कमी पडत नाही’
संत भगवानबाबांनी सुरू केलेल्या वारकरी संप्रदायाची पताका भगवानगड परिसरात अखंडपणे सुरू आहे. गडाच्या विकासासाठी परिसरातील नागरिकही आपल्या परीने हातभार लावत आहेत. साधुसंतांच्या कृपेने भगवानगडावर कोणतीच गोष्ट कमी पडत नाही, अशी भावना नागलवाडीचे माजी सरपंच संजय वडते यांनी व्यक्त केली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List