बाल कीर्तनकाराच्या दमदार निरूपणाने हरिनाम सप्ताहाचा पहिल्याच दिवशी भक्तीचा तुफान रंग
आधुनिक केसरी न्यूज
भोकरदन : संसाररूपी भवसागरातून मानवाचा उद्धार नामस्मरण,संतसंग आणि सदाचरणातूनच होतो, असा प्रभावी संदेश बाल कीर्तनकार ह.भ.प.भक्तीताई सावंत यांनी दिला. त्यांच्या दमदार आणि रसाळ निरूपणाने चोर्हाळा येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला.श्री नागेश्वर बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी असलेल्या भक्तीताईंनी संत तुकाराम महाराजांचा ‘सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला...’ हा अभंग निरूपणासाठी घेतला. पैसा, प्रतिष्ठा, मोह-माया आणि प्रपंचाच्या धावपळीत मानवी जन्म व्यर्थ घालवू नका; भगवंताचे नामस्मरण आणि चांगले आचरण हाच जीवनाचा खरा मार्ग असल्याचे त्यांनी सोप्या उदाहरणांतून पटवून दिले.दिखावा नको, निर्मळ भाव हवा असा स्पष्ट संदेश देत त्यांनी प्रेम, दया, माणुसकी, प्रामाणिकपणा आणि परोपकार हीच खरी भक्ती असल्याचे सांगितले.बालवय असूनही अभंगातील गहन आध्यात्मिक विचार अत्यंत प्रभावीपणे मांडल्याने उपस्थित भाविक भारावून गेले.या कीर्तनसेवेला ह.भ.प. शंकर महाराज साबळे गुरुजी, ह.भ.प. सोमनाथ महाराज सहाने, ह.भ.प. संतोष महाराज पवार व ह.भ.प. बोर्डे महाराज यांचे गायनाचे सहकार्य लाभले. मृदंगाचार्य कृष्णा महाराज शिंदे यांच्या दमदार साथसंगतीने कीर्तनाला रंगत आणली.टाळ-मृदंगाचा निनाद, विठ्ठलनामाचा जयघोष आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण चोर्हाळा भक्तिरसात न्हाऊन निघाला. पहिल्याच दिवशी भक्तीचा जल्लोष झाल्याने पुढील कार्यक्रमांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List