डेंग्यू-मलेरियाला ‘नो एंट्री’; दानवेंचा आरोग्य यंत्रणेला थेट आदेश..!
आधुनिक केसरी न्यूज
अमोल शिंदे
भोकरदन : पावसाळा सुरू होताच साथीच्या आजारांनी डोके वर काढण्याची शक्यता असताना भोकरदन तालुक्याची आरोग्य यंत्रणा आता ‘अलर्ट मोड’वर आली आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आणि तत्पर आरोग्यसेवा पोहोचलीच पाहिजे,कोणताही रुग्ण उपचाराविना परत जाता कामा नये, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र पंचायतीराज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संतोष दानवे यांनी दिले.भोकरदन येथे रविवारी (दि. १६) एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आमदार दानवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी त्यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत आवश्यक त्या उपाययोजनांचे निर्देश दिले.
डेंग्यू-मलेरियाला आळा घालण्यासाठी गावागावांत मोहीम
पावसाळ्यात डेंग्यू,मलेरिया तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे आजार पसरण्याची वाट पाहण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबवा, अशा सूचना आमदार दानवे यांनी दिल्या.गावागावांत औषध फवारणी,पाणी शुद्धीकरण आणि आवश्यक स्वच्छता उपाययोजनांवर विशेष भर देण्याचे आदेश त्यांनी दिले.
आरोग्य केंद्रांत औषधांचा पुरेसा साठा ठेवा
तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात जीवनरक्षक औषधांसह आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असावा. अचानक रुग्णसंख्या वाढल्यास आरोग्य यंत्रणेची धावपळ होऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी ठेवावी,असे त्यांनी स्पष्ट केले.वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून नागरिकांना आपुलकीने व तत्परतेने सेवा द्यावी. विशेषतःमाता-बाल संगोपनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत त्याचा थेट लाभ पोहोचवावा, असेही दानवे यांनी सांगितले.
‘रुग्णाला उपचाराविना परत पाठवू नका’
आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या कोणत्याही नागरिकाला केवळ सुविधा किंवा औषधांच्या अभावामुळे परत जावे लागू नये,याची जबाबदारी संबंधित यंत्रणेने घ्यावी. ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय आरोग्य व्यवस्था हीच मोठी आधारव्यवस्था असल्याचे आमदार दानवे यांनी नमूद केले.
अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जाफ्राबादच्या नगराध्यक्ष कविता वाकडे, भोकरदनच्या नगराध्यक्ष समरीन मिर्झा,संतोष लोखंडे, विजय नाना परिहार,शालिकराम म्हस्के, नाना भागिले, मनोज पाटील शिंदे, डॉ. चंद्रकांत साबळे, कौतिकराव पाटील जगताप, राजेश पाटील चव्हाण, मधुकर पाटील गाडे, गणेश ठाले, गणेश इंगळे, विजय कड, दीपक जाधव, विजय परिहार, सुभाष देशमुख, ज्ञानेश्वर पुंगळे, बालु औटी, आशाताई पांडे, मदन शेठ कुलवाल, भगवान खाकरे, गौतम मस्के, राजू खोत, शेख कौसर, भाऊसाहेब भुजंग, गजानन नागवे आदी उपस्थित होते.यावेळी गटविकास अधिकारी लिंबाजी बारगीर, सहाय्यक गटविकास अधिकारी आकाश कोरडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंदेल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा मुळीक, ग्रामीण रुग्णालय भोकरदनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा वानखेडे, ग्रामीण रुग्णालय जाफ्राबादचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एम. पाटील यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List