गोदावरी खोऱ्यातील प्रकल्प बंदी उठवावी : आमदार काशिनाथ दाते
सौर प्रकल्पासह प्लास्टिक फुलांचे सुळसुळाटवर लक्ष घाला
आधुनिक केसरी न्यूज
श्रीनिवास शिंदे
पारनेर : नगर मतदारसंघातील अनेक शेतकरीविरोधी समस्यांवर आमदार काशिनाथ दाते सर यांनी राज्य विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली. राज्य सरकारच्या विविध योजनांचे स्वागत करत असतानाच या योजनांची अंमलबजावणी करताना मतदारसंघातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या गंभीर अडचणींवर त्यांनी संयुक्त प्रस्ताव (नियम २९३) चर्चा अंतर्गत जोरदार प्रहार केला.
मतदारसंघातील ४१ गावांमध्ये जलसंधारण प्रकल्प उभारण्यावर शासनाने आणि न्यायालयाच्या जनहित याचिकेमुळे घातलेली बंदी स्थानिक पातळीवर अन्यायकारक ठरत असून, त्यामुळे २७ हजार हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली येण्याची संधी गमावली जात आहे असे सांगत ही बंदी उठवणे आवश्यक असल्याचा ठाम निर्वाळा त्यांनी दिला. यासाठी औरंगाबाद खंडपीठात शासनाने फेर याचिका दाखल करावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.
पुढे बोलताना आमदार दाते सरांनी प्लास्टिक फुलांच्या अतिरेकी वापरामुळे राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांचे बाजारभाव पडल्याचे कटू वास्तव विधीमंडळा समोर मांडले. मुंबईच्या आझाद मैदानावर फुल उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा हीच त्यांच्या व्यथा व्यक्त करणारी ठिणगी असून, या पार्श्वभूमीवर शासनाने प्लास्टिक फुलांच्या उत्पादन व वापराबाबत नवीन धोरण आणण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेले पारनेरमधील पाच सौर ऊर्जा प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. याशिवाय वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतात सौर युनिट बसवण्यास एजन्सीचा अक्षम्य विलंब, आणि विज वितरण कंपनीकडून कनेक्शन टाळण्याचा प्रकार यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक त्रास सहन करत आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित लक्ष घालून मुबलक वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी आग्रही मागणी आमदार दातेंनी केली.
शेतकऱ्यांच्या समस्यांवर सडेतोड मांडणी करत, विधायक पर्याय सुचवणारे आमदार दाते सरांचे विधानसभेतील हे भाषण पारनेर-नगर मतदार संघातील शेतकरीवर्गाच्या आशा पल्लवित करणारे ठरत आहे.
चौकट : राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती व्यवसायाच्या हितासाठी शेतकरी केंद्रस्थानी ठेवून शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी होत असताना, येणाऱ्या अडचणींवरही मार्ग काढला पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, एकनाथ शिंदेंसह मंत्रिमंडळाचे शेतकरी हिताच्या निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन.
-आ. काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List