पूरामुळे शाळकरी विद्यार्थी अडकले; स्थानिक व प्रशासनाच्या तत्परतेने सुरक्षित घरी पोहचवले..!
आधुनिक केसरी न्यूज
वरोरा : तालुक्यातील भटाळा, खेमजई, वडगाव, नांद्रा, लोदीखेडा, येरखेडा आदी गावांतील शाळकरी विद्यार्थ्यांची बस काल रात्री परतीच्या मार्गावर असताना नाल्याला आलेल्या पूरामुळे अडकली. वाहनचालकांनी सुरक्षेच्या दृष्टीने धोका पत्करला नाही व नाल्यावरून बस नेण्याचा निर्णय न घेता पाणी ओसरल्यानंतरच प्रवास करण्याचे ठरवले.
दरम्यान स्थानिक आसाळा येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत 60 ते 70 मुला-मुलींसाठी जेवणाची व्यवस्था केली. तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री गजानन मुंडकर, तहसीलदार वरोरा श्री योगेश कौटकर, मंडळ अधिकारी श्री. अजय निखाडे, तलाठी आसाळा श्री. रितेश आमटे, तलाठी टेमुर्डा श्री. सुनील राऊत, कोतवाल श्री. चांदेकर व शिपाई श्री. सचिन शेळकी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री उशिरा मुलींची राहण्याची व्यवस्था समाजभान आसाळा येथे तर मुलांची राहण्याची व्यवस्था टेमुर्डा येथील समाजभवनात करण्यात आली.
सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस प्रशासनाने लेडी कॉन्स्टेबल्ससह शिपायांचे पथक घटनास्थळी पाठविले. अखेर रात्री साडेअकराच्या सुमारास नाल्याचे पाणी ओसरल्याने आगार व्यवस्थापकांच्या सल्ल्यानुसार बस परत सोडण्यात आली.
विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी टप्प्याटप्प्याने सोडताना प्रत्येक गावात महसूल,ग्राम विकास,पोलीस प्रशासनाकडून जीपीएस फोटोग्राफ व व्हिडिओ घेण्यात आले, जेणेकरून विद्यार्थी योग्य ठिकाणी सुखरूप पोहोचले आहेत याची खात्री करता आली. या काटेकोर प्रक्रियेमुळे पालक व विद्यार्थ्यांच्या मनात समाधान व आनंद होता.
या संपूर्ण प्रसंगात वाहनचालकांची दक्षता, स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य व प्रशासनाची तातडीची कार्यवाही यामुळे संभाव्य धोका टळला.यावेळी स्थानिकांनी विशेषतः ग्रामीण भागातील नाल्यांमध्ये अडकणारा केरकचरा व झाडेझुडपे नियमितपणे स्वच्छ करण्याची मागणी केली. प्रशासनाच्या वतीने संबंधित विभागाकडून येत्या काळात या बाबीवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान वरोरा तालुक्यामध्ये सदर दिवशी काही मंडळात 120 मिमी तर काही मंडळात 60 मिमी इतका पर्जन्य नोंदविण्यात आला. या पावसाचा अंदाज एक दिवस आधीच घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशी शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रवास टाळण्याच्या दृष्टीने माननीय जिल्हाधिकारी महोदय श्री विनय गौडा साहेब , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप सिंग साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी श्री कुंभार साहेब व जिल्हा शिक्षण अधिकारी श्रीमती सोनावणे मॅडम यांनी संयुक्तरीत्या निर्णय घेऊन वरोरा तालुक्यासाठी विशेष बाब म्हणून शाळांना सुट्टी जाहीर केली. स्थानिक प्रशासनाने हा निर्णय सर्व शाळांमार्फत पालकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण कार्यवाहीत स्थानिक मा.खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर मॅडम व मा.आमदार श्री करण देवतळे साहेब यांच्या सूचना व मदतीने प्रशासनाने समन्वय साधून कार्य केले, त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका शक्य झाली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List