श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी
आधुनिक केसरी न्यूज
श्रीक्षेत्र माहूर : येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती (गुरु प. पू. अच्युत भारती महाराज) (वय ९५) यांचे शनिवार दि. ४ एप्रिल रोजी सायं. ५ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाने माहूरसह संपूर्ण धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली असून असंख्य भक्तगण शोकसागरात बुडाले आहेत.
हिंदू धर्मपरंपरेनुसार त्यांनी काही दिवसांपासून प्रयोपवेशन (संकल्पपूर्वक देहत्यागाची साधना) स्वीकारून आपल्या इहलोकातील प्रवासाची सांगता करण्याचा संकल्प केला होता, अशी माहिती समोर येत आहे.सन १९७८ मध्ये त्यांचे गुरु प. पू. अच्युत भारती महाराज वैकुंठवासी झाल्यानंतर विधिवत परंपरेनुसार प. पू. मधुसूदनजी भारती महाराज यांची श्री दत्त शिखर संस्थानच्या गादीवर नियुक्ती करण्यात आली होती. तब्बल चार तप (सुमारे ४८ वर्षे) त्यांनी या गादीवर विराजमान राहून कठोर तपश्चर्या, साधना व धर्मसेवा केली. त्यांच्या साधेपणामुळे, आध्यात्मिक तेजामुळे आणि भक्तांप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे ते सर्वांच्या आदराचे केंद्र होते. त्यांच्या जाण्याने श्री दत्त शिखर संस्थानची मोठी आध्यात्मिक पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या पश्चात असंख्य शिष्य, भक्तपरिवार व धर्मप्रेमी नागरिक असा मोठा परिवार आहे.
आध्यात्मिक क्षेत्रातील दीपस्तंभ हरवला - खासदार चव्हाण
माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदनजी भारती (मालक) महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या देवाज्ञेमुळे आध्यात्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे. गेल्याच आठवड्यात मी त्यांचे दर्शन घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. महाराजांनी आपल्या जीवनकार्यात केवळ भक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर सेवा व मानवतेचीही शिकवण दिली. माहूर गडावरील दत्त शिखर संस्थानची आध्यात्मिक परंपरा त्यांनी अत्यंत प्रभावी व शिस्तबद्ध पद्धतीने जपली. महाराजांच्या रूपात एक थोर विचारवंत आणि मार्गदर्शक हरपले आहे. त्यांचे कार्य आणि शिकवण भक्तांच्या माध्यमातून सदैव अजरामर राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List