एलएलबी परीक्षेस बसण्याची संधी द्या’ विद्यार्थ्यांचे विद्यापीठात आंदोलन
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : दि.१३ विद्यापीठ प्रशासनाने ठराविक वेळेत अभ्यासक्रम पूर्ण केलाच पाहिजे असा फतवा काढून एलएलबी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यास मनाई केली आहे. या अन्यायाच्या विरोधात आज ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्या विद्यार्थ्यांनी आज विद्यापीठात आंदोलन केले. यावेळी प्र-कुलगुरुंशी परीक्षेस बसू देण्याची मागणी करण्यात आली. विविध अडचणींमुळे एक, दोन विषय बॅक राहिलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने वेठीस धरले आहे. विद्यापीठातील अधिकारी मनमानी पद्धतीने अचानक नियम बदलून विद्यार्थ्यांना वेठीस धरतात. विधी शाखेच्या बाबतीतही पूर्वसूचना न देता विद्यापीठाने अचानक एलएलबी तिसर्या वर्षात एक, दोन, तीन विषय बॅक लागलेल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास नकार दिला.
‘हम करे सो कायदा’ भूमिका
इतर विद्यापीठांमध्ये बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या धोरणाप्रमाणे शिक्षणक्रम पूर्ण करण्याविषयी मर्यादा दिलेली नाही. नागपूर विद्यापीठातही विधि शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याविषयी कालावधीची आडकाठी नाही. मात्र या विद्यापीठात हा अघोरी नियम लागू करण्यात आला आहे. युजीसीचा नियम सर्वांना सारखा असे विद्यापीठ प्रशासन सांगते. मात्र नियमावर बोट ठेवताच इतर विद्यापीठात काय होते याविषयी आम्हाला घेणेदेणे नाही अशीही मखलाशी प्रशासन करत आहे. या चर्चेत हम करे सो कायदा अशीच भूमिका विद्यापीठाने घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
विनंतीवरून नियम बदलत नसतात
विद्यापीठ प्रशासनाने बीएच्या २०१३ पॅटर्नचे आणि बी. कॉमच्या २०१८ पॅटर्नच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा फॉर्म भरू दिले नव्हते. मात्र नंतर या दोन्ही शाखांच्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी म्हणून यावर्षी फॉर्म भरण्यास परवानगी देण्यात आली. याचा दाखला देत विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरूंना विनंती केली. मात्र विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून नियम बदलत नसतात असे उत्तर त्यांनी दिल्याने विद्यार्थी निशब्द झाले.
हा दुजाभाव कशासाठी
सर्वांना समान संधीचा पुरस्कार करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लावणारे हे विद्यापीठ बी. ए., बी. कॉम. शाखांना वेगळा न्याय आणि विधि शाखेला वेगळा न्याय कसा करू शकते असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वांना समान न्याय द्यायचा असेल तर तीन वर्षांत पी. एच, डी. संशोधन पूर्ण न करणार्या विद्यापीठातील प्राध्यापकांचे राजीनामे विद्यापीठ घेणार का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
काय आहेत मागण्या?
एलएलबी विधी अध्यादेश ९९ नुसार सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात, तीन वर्षाची एलएलबी विधी पदवी सहा वर्षात पूर्ण करा म्हणणारे विद्यापीठाचे परिपत्रक रद्द करा, एलएलबी रिपीटर सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात यावी, रिपीटर विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज तात्काळ भरून घेण्याचे आदेश संबंधीत महाविद्यालयांना देण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या.
वरील मागण्या पूर्ण न झाल्यास लवकरच ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून विधी पदवी परीक्षेपासून वंचित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे शहराध्यक्ष मधुकर गायकवाड, शहर सचिव अनंता कर्हाळे, नितीन मेंढे, परीक्षेपासून वंचित विद्यार्थी पंकज इंगळे, करुणा गुट्टीकर, धनंजय बेहाळे, आकाश जाधव, नंदकिशोर कुटे यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List