विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
शेतकऱ्यांच्या मागणीला यश - प्रशासनाची तातडीने दखल
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी गोसेखुर्द धरणातून दोन दिवसांत सिंचनासाठी पाणी न सोडल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशाराव शेतकऱ्यांच्या रोषाला प्रशासनालाच सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली असून उद्या दि.१७ जुलै सकाळी १० वाजता गोसेखुर्द चे पाणी सोडणार असल्याचे कळविले आहे.
ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, सावली तसेच परिसरातील हजारो शेतकरी पाण्याअभावी संकटात सापडले आहेत. धानासह अन्य पिके करपत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आ. वडेट्टीवार यांनी प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर केवळ एका दिवसात प्रशासनाने निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी आ. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, "हा विजय माझा नसून शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि त्यांच्या हक्काच्या लढ्याचा आहे. प्रशासनाने योग्य वेळी निर्णय घेतल्यामुळे हजारो हेक्टर शेतीला दिलासा मिळणार आहे. मात्र, भविष्यात अशा प्रश्नांवर शेतकऱ्यांना आंदोलनाची वेळ येणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी."सोबतच गोसेखुर्द कालव्याची प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करून शेती हंगामात शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी मुबलक पाणी पुरवठा व्हावा याची वेळोवेळी काळजी संबंधित विभागाने घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.
गोसेखुर्दचे पाणी नियोजित वेळेत सोडले जाणार असल्याने सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आ. विजय वडेट्टीवार यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे प्रशासनाला अखेर झुकावे लागल्याची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे. मतदार संघाचे प्रश्न असो अथवा राज्यातील कुठलेही प्रश्न असो आपल्या आक्रमक शैलीत न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार हे नेहमीच हिरीरीने प्रयत्न करतात. प्रत्येक सामन्याला न्याय मिळवून देणे हे लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य असून लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असल्याने लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी समर्पित भावनेने कार्य केले पाहिजे असे मत विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List