श्रींच्या पालखीचे पंढरपूर वारीकरीता प्रस्थान पालखी निघाली भक्तांसंगे
दुपारी अकोला जिल्ह्यात आगमन..!
आधुनिक केसरी न्यूज
दिपक सुरोसे
शेगांव : दि.२१ पंढरीचा महिमा । देता आणीक उपमा ॥१॥
ऐसा ठाव नाही कोठे। देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥
आहेति सकळ । तीर्थे काळे देती फळ ॥२॥
तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥
संत तुकाराम महाराज. पंढरपूरचा महिमा इतका मोठा आहे की त्याला दुसरी कोणतीही उपमा देता येत नाही.”या जगात पंढरपूरसारखे दुसरे ठिकाण नाही, कारण इथे देव स्वतः उभा राहून भक्तांना भेटतो.इतर तीर्थक्षेत्रांचे फळ मिळण्यासाठी वेळ लागतो, पण पंढरपूरात विठ्ठलाचे दर्शन घेताच भक्ताला लगेच कृपा मिळते. तुकाराम महाराज म्हणतात —ही पंढरी म्हणजे पृथ्वीवरील वैकुंठच आहे.म्हणजेच, जसे विष्णूचे वैकुंठ स्वर्गात आहे, तसेच पंढरपूर हे पृथ्वीवरील वैकुंठ मानले जाते आज रविवार दि.२१ जुन रोजी सकाळी ७ वा. श्रीचे सेवाधारी विश्वासत यांच्या हस्ते श्रींच्या पालखीचे विधीवत पूजन करुन श्रींचे दर्शन घेतले. शेगाव येथून श्रीची पालखी मंदिरामधून ७०० वारकऱ्यांसह हजारो भाविक भक्तांच्या सहभागाने राजवैभवी थाटात आषाढी एकादशी वारी महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे. सनई चौघडाच्या आवाज, ज्ञानोबा तुकाराम नामघोष, हजारो भाविकांच्या मुखातून गजानन महाराज की जय असे जय घोष यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
संतनगरीत श्रींच्या पालखीच्या निमित्ताने टाळ मृदंगासह हरिनामाचा नामघोष संत नगरी दुमदुमली आहे. श्रीं ची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ,उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने ३३ दिवसा पायीवारी करीत एकूण ७५० किलोमिटर प्रवास करती दि.२३ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास पोहचेल. ५ दिवसापर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्कामास राहील. आणि आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर दि.२९ जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगांवकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल. दि १९ ऑगस्ट २०२६ रोजी पालखी खामगाव मार्गे संतनगरी शेगावला परत येईल.
पाऊले चालती पंढरीची वाट
श्रींच्या पालखी मार्गावर शहरातील सेवाभावी संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी पाणी, चहा, नींबू शरबत, मंठा अशी व्यवस्था करण्यात आली होती.श्रींची पालखी सकाळी १० वाजता श्री नागझरी येथे जात असताना श्री रोहणकार परिवार यांच्या वतीने श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री क्षैत्र नागझरी येथे श्रींच्या पालखीचे स्वागत..
शेगांव येथुन निघुन श्रींच्या पालखीच्या सकाळी ११. ३० वाजता श्री क्षैत्र नागझरी येथे श्री संत गोमाजी महाराज संस्थान अध्यक्ष श्री धनंजय दादा पाटील यांच्या हस्ते श्रींच्या पालखीचे विधिवत पूजा करुन स्वागत करण्यात आले श्रींच्या पालखीची आरती नंतर वारीतील वारकऱ्यांनी महाप्रसाद घेतला तर श्रींच्या पालखीला नागझरी पर्यंत निरोप देण्यासाठी आलेल्या हजारों भाविकांनी सुद्धा महाप्रसाद लाभ घेतला. आज श्री ची पालखी नागझरी येथे आल्यानंतर या ठिकाणी यात्रेचे स्वरूप आले होते. श्री संत गजानन महाराज व श्री संत गोमाजी महाराज या संतांची दर्शन हजारो भाविकांनी घेतले.
१) पायदळ वारीचे ५७ वे वर्ष
श्रींच्या पंढरपूर पालखी पायदळ वारीचे यंदा ५७ वे वर्ष आहे. श्री गजानन महाराज संस्थानने अखंडितपणे पायदळ वारीचीपरंपरा कायम ठेवली आहे. या पालखी सोबत शेकडो वारकरी भाविक पंढरपूरची वारी करत असतात. वारीमध्ये सहभागी सर्व वारकरी भक्त यांची सवीतोपरी व्यवस्था श्री संस्थान कडून करण्यात येते.
२) शहरातील या मार्गावरुन श्रींचे पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी करीता रविवार दि.२१ जुन २०२६ रोजी सकाळी ७.०० वा. श्री मंदिरातून प्रस्थान झाले. श्रींची पालखीचे उत्तर द्वारातून, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले चौकातून, श्री संत सावता माळी चौक, श्री हरिहर मंदिर, तिन पुतळे परिसर भिम नगर, श्री क्षेत्र नागझरी रोडने श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारीसाठी मार्गस्थ झाली आहे.
३) वारी... संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी एक अजब जादूगरी . . . प्रत्येकवर्षी न विसरता न चुकता आषाढीची वारी करून आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेणे, त्याला डोळेभरून पाहाणे ही सच्च्या वारकयाची ओळख! खांद्यावर भगवी पताका घेउन उन्हातान्हात, पाऊसपाण्यात कशाकशाची तमा न बाळगता विठुरायाचे ओठावर अखंड नामस्मरण करत वारकरी पंढरीच्या वाटेवर निघतात . . . . शेकडो कोस पायी वारी करून फक्त विठोबाचे डोळे भरून दर्शन घेणे हेच या वारीचं साध्य!
४) चौख पोलीस बंदोबस्त...
जिल्हा पोलिस प्रशासनाने पालखी मार्गावर चौख
पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेआहे.
५) रांगोळी...
श्रींच्या पालखीचे प्रस्थानवेळी पालखी मार्गावर विविध रंगबेरंगी आकर्षक रांगोळी काढले होते. तर भाविकभक्तांच्या दर्शनसाठी गर्दी केली होती तर या सोहळ्याला विदर्भ, मराठवाडा,खानदेशातील हजारो भाविक उपस्थित होते.
६) वारी पेहराव..
वारी सोहळ्यामधील धवलवस्त्राधरी वारकरी म्हणजे जणू शुद्धतेचे आणि सात्विकतेचे प्रतिक आहेत. पांढरा सदरा, धोतर,डोक्यावर टोपी, कपाळावर बुक्का, गळ्यांत तुळशीची माळ असा वारकर्यांचा पेहराव आहे.
७) श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर वारी करीता जात असतांना मार्गाने भेटणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांकरीता औषधोपचार केल्या जातो.
८) श्रींची पालखी वेगवेगळ्या ९ जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करीत शेगांव ते पंढरपूर प्रवास ३३ दिवसाचा ७५० कि.मी. चे अंतर पार करते.
९) श्रींचे पालखी सोबत ७०० वारकरी मंडळीसह १ अश्व व ९ वाहने आहेत.
१०) वारकऱ्यांकरीता अॅम्बुलन्स गाडी डॉक्टर व सहकार्यासह आहे. याव्दारे श्री पालखीतील व वाटचालीमध्ये असणाऱ्या इतर दिंडीतील वारकऱ्यांकरीता औषधोपचार केल्या जातो.
११) वारकऱ्यांकरीता पाणी पिण्याकरीता टँकरची व्यवस्था आहे.
श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि. २३ जुलै २०२६ ला पोहचेल.दि.२३ जुलै ते २८ जुलै पर्यंत मुक्काम राहील व दि २९ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथुन परत शेगांव कडे परतीच्या प्रवासाला सुरुवात होऊन दि.१९ ऑगस्ट रोजी श्रींची पालखी शेगांव येथे दाखल होणार आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List