अंबड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; रुई येथे वासराचा बळी वनविभागाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप
आधुनिक केसरी न्यूज
सुखापूरी : अंबड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून सुखापुरी, पिटोरी, सिरसगाव, करंजळा, कुक्कडगाव व वडीकाळ्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रुई येथे शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात घुसून एका वासराचा बळी घेतल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रुई येथील शेतकरी भगवत ढवळे यांच्या शेतातील गोठ्यात घडलेल्या या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून बिबट्या आता थेट मानवी वस्तीजवळ येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गायीवर झालेल्या हल्ल्याची दृश्ये पाहूनच नागरिक घाबरले होते, त्यातच रुईतील ताज्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनांनंतरही वनविभागाकडून कोणतीही प्रभावी किंवा तातडीची कारवाई न झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.बिबट्याच्या वावराची वारंवार माहिती दिल्यानंतरही वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी वेळेत पोहोचत नाहीत, पिंजरे बसवले जात नाहीत, गस्त वाढवलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सुरक्षिततेचे आवाहन केले असले तरी वनविभागाची निष्क्रियता प्रकर्षाने जाणवत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे.
रुईतील भगवत ढवळे यांच्या जनावरांवरील हल्ल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून वनविभाग फक्त “सावध राहा” एवढेच सांगत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
याचदरम्यान आज सकाळी वनविभागाचे अधिकारी गणेश तुपे आणि शेषराव राठोड घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत रात्रीच्या वेळी विशेष सावधगिरी बाळगण्याच्या तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ कळविण्याच्या सूचना दिल्या.
परिसरातील नागरिकांची मागणी आहे की बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी आणि कर्तव्यपालनात ढिलाई करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. वाढत्या बिबट्या-दहशतीमुळे पशुधनाबरोबरच नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List