मदनवाडी येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली युवक ठार
आधुनिक केसरी न्यूज
निलेश मोरे
भिगवण : दि.५ ऊस हंगाम सुरू होताच ऊस वाहतुकीमुळे पहिला बळी गेल्याची दुर्दैवी घटना इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे घडली आहे. या अपघातात किशोर बाळासो साळुंखे (वय ३०, रा. मदनवाडी, विरवाडी नं. २) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.ही घटना ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भिगवण–बारामती रोडवरील मदनवाडी गावच्या कमानीसमोर घडली. फिर्यादी निलेश बाळासो साळुंखे (वय ३३) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे भाऊ किशोर हे टीव्हीएस स्पोर्ट (एम एच.४२ ए व्ही ९३२५) या दुचाकीवरून जात असताना, महिंद्रा कंपनीचा अर्जुन ६०५ (एम एच.१८ सिई.७१५३) या लाल ट्रॅक्टरच्या अज्ञात चालकाने बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवून मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
धडकेमुळे किशोर साळुंखे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेनंतर मृतदेह पुढील सोयीस्करसाठी “आपुलकी सेवा ॲम्बुलन्स”मधून रुग्णालयात नेण्यात आला.
या प्रकरणाचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे हवालदार महेश उगले करत असून सपोनि महांगडे हे प्रभारी अधिकारी आहेत.
ऊस वाहतुकीत नियमांचे सर्रास उल्लंघन : ऊस हंगाम सुरू होताच परिसरातील रस्ते ट्रॅक्टर–ट्रॉलींच्या ताफ्यांनी गजबजतात, मात्र ही वाहतूक अनेकदा बेदरकार आणि नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचे चित्र दिसते. मोठ्याने टेप लावून कर्णकर्कश गाणी वाजविणे, अल्पवयीन मुलांकडून ट्रॅक्टर चालवून घेणे, तसेच रिफ्लेक्टर नसलेल्या व नंबरप्लेट न लावलेल्या ट्रॉली ही आता सर्वसाधारण दृश्ये झाली आहेत. रात्रीच्या वेळी अशा ट्रॉली दिसत नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनचालकांना धोक्याची चाहूलही लागत नाही, परिणामी जीवघेणे अपघात घडतात.
पोलीस व आरटीओ विभागाचे दुर्लक्ष? स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन होत असताना पोलीस व आरटीओ विभाग मात्र मौन का बाळगतात?दरवर्षी ऊस हंगामात असे अपघात घडूनही कारवाई केवळ दाखवण्यापुरतीच होते, अशी टीका केली जात आहे.ग्रामस्थांनी रात्रीची गस्त, ट्रॅक्टर तपासणी आणि अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांची मागणी : गावकऱ्यांनी प्रशासनाकडे रिफ्लेक्टर, नंबरप्लेट आणि वाहतुकीच्या वेळेवरील नियम कडकपणे अंमलात आणावेत, अशी मागणी केली आहे. “एका निष्काळजी चालकामुळे एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला आता तरी जबाबदार विभाग जागे होतील का?” असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List