राजगड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; ५६ मोबाईल व सोन्याची अंगठी परत मिळवून देत ५.४८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांकडे सुपूर्द
आधुनिक केसरी न्यूज
विशाल शिंदे
राजगड : पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी हरवलेल्या मालमत्तेचा शोध घेत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. पोलिसांनी ५६ मोबाईल फोन व एका सोन्याच्या अंगठीचा एकूण ५,४८,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात परत केला. या उल्लेखनीय कामगिरीचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.
हरवलेली अंगठी परत मिळण्याची हकीकत
तक्रारदार सनत सुहास मोहरीर (वय २९, रा. महाळुंगे, पुणे) हे आपल्या पत्नीबरोबर दर्शनासाठी नसरापूर येथील सुप्रसिद्ध बनेश्वर मंदिरात आले होते. दर्शन झाल्यानंतर परत जात असताना त्यांनी खिशातून रूमाल काढला आणि त्याच वेळी त्यांच्या लग्नातली सोन्याची अंगठी खाली पडली. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ राजगड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांची तत्पर कारवाई
तक्रार नोंदताच पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मंदिर परिसरात तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले आणि अंगठी शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. अंगठी शोधल्यानंतर ती तक्रारदार मोहरीर यांच्या ताब्यात देण्यात आली. अंगठी मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आणि पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले
५६ मोबाईल फोनही परत
याव्यतिरिक्त, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू वर्षात हरवलेले ५६ मोबाईल फोनही शोधून काढण्यात आले आहेत. या मोबाईल फोनची अंदाजे किंमत ४,४८,००० रुपये असून, सोन्याच्या अंगठीची किंमत सुमारे १,००,००० रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी नागरिकांचा एकूण ५,४८,००० रुपयांचा मुद्देमाल परत करत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.
पोलिसांच्या प्रयत्नांना यश
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तसेच पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, स.पो. फौ. चव्हाण, पोलीस अंमलदार अक्षय नलावडे, मंगेश कुंभार, अजय चांदा यांनी विशेष मेहनत घेतली
नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव
हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळाल्यामुळे नागरिकांनी राजगड पोलिसांचे आभार मानले. ‘राजगड पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि कष्टामुळे आम्हाला आमची मौल्यवान वस्तू परत मिळाली, याबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत,’ असे नागरिकांनी सांगितले.राजगड पोलिसांनी केलेल्या या कार्यामुळे पोलिसांवरचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. पोलिसांनी अशाच प्रकारे नागरिकांच्या मदतीस तत्पर राहावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List