वन्य प्राण्यांकडून उभ्या पिकाची नासाडी; शेतकऱ्याकडून नुकसाभरपाईची मागणी
आधुनिक केसरी न्यूज
आत्माराम जाधव
जवळा ( रिसोड ) : यावर्षीच्या सुरवातीपासूनच दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. रब्बी हंगामातील पीक आतोनात खर्च करून कसेबसे जगविल्या जात आहे. मात्र वन्य प्राण्यांकडून उभ्या पिकाची नासाडी केली जात आहे. रिसोड तालुक्यातील आगरवाडी येथील शेतकरी पंडित साहेबराव वाकळे यांच्या एक एकर शेतातील उभ्या असलेल्या गव्हाची नीलागायीच्या कळपाने तुडवातुडव करून नासाडी केली आहे. सदर नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी संबंधीत शेतकऱ्याने केली आहे.
तालुक्यातील बंदिसदृष भागात असलेल्या भर जहाँगीर शेतशिवारात सदर शेतकऱ्याचे शेत असून,हरीण, रानडुकर, नीलगायी आदी वन्य प्राण्यांचा हैदोस वाढल्यामुळे शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यासाठी बरेच शेतकरी रात्रभर जागल करून पिकाची राखण करीत आहेत. परंतू न कळत जागलकऱ्यांचा डोळा लागल्यास वन्य प्राणी धुमाकूळ घालून पिकाची नासाडी करीत आहेत. त्यामुळे बरेच शेतकरी संकटात सापडले आहेत. या गंभीर बाबीकडे संबंधीत वन विभागाने लक्ष घालून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.
वन विभागाचे दुर्लक्ष
पावसाअभावी यावर्षी खरिप हंगामातील पिकांनी शेतकऱ्यांची निराशा केली आहे.तर अवकळी पावसाने रब्बी हंगामातील तूर, हरभरा, आदी पिकांची वाट लागली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. परिणामी आपसूकच गव्हाच्या पेऱ्यात कमालीची वाढ झाली आहे. सदर पीक जगविण्यासाठी डोंगराळ भागातील शेतकरी रात्री अपरात्री पिकाची राखण करीत आहेत. तरीसुध्दा वन्य प्राण्यांचा हैदोस सुरूच आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वन विभागाने याची दखल घेऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List