शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची NSUIची मागणी; सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार अपयशी
आधुनिक केसरी न्यूज
सांगली : राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांवरून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी NSUIचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून राज्यभर तीव्र विद्यार्थी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
चव्हाण म्हणाले की, राज्यातील शिक्षण व्यवस्था गंभीर संकटातून जात आहे. ग्रामीण भागातील शाळा बंद होणे, टीईटी पेपरफुटी, प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, रखडलेल्या शिष्यवृत्ती, शिक्षकांची कमतरता, उच्च शिक्षणातील वाढती फी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्नांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
शिक्षकांना बीएलओची कामे देण्यात येत असल्याने अध्यापनावर परिणाम होत असल्याचा आरोप करत त्यांनी शिक्षकांचे प्रलंबित भत्ते तातडीने अदा करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुंबई येथे विविध विद्यार्थी व युवक संघटनांच्या बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देताना, सांगली जिल्ह्यातही विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाद्वारे जनजागृती, स्वाक्षरी मोहीम, निवेदने, धरणे आणि निदर्शने अशा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यभर आंदोलनाचा इशारा
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावेत. अन्यथा NSUI राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल. आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार आणि शिक्षणमंत्री यांचीच असेल. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरू राहील, असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List