आवाज केला तर जिवे मारुन टाकु अशी धमकी देत बंदुकीचा धाक दाखवत ७ लाख लुटले; एक जण गंभीर जखमी..!
आधुनिक केसरी न्यूज
हिंगोली : आवाज केला तर जिवे मारून टाकू, चुपचाप पेटीची चाबी द्या अशी धमकी देऊन बंदूक घेऊन आलेल्या चौघांनी शेतकर्यास मारहाण करून जखमी केले. त्यानंतर घरातील रोख रकमेसह ७ लाखांचा ऐवज पळवल्याची घटना शुक्रवार दि.६ जुन रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या एकास उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णलायात हलवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील घोरदरी येथे माणिक साबळे यांचे १२ एकर शेत आहे. गावालगत असलेल्या शेतातच त्यांचे घर आहे. या ठिकाणी माणिक साबळे हे त्यांची पत्नी, मुले, सुना यांच्यासह राहतात. गुरुवार दि.५ जुन रोजी माणिक यांनी शेतीमाल विक्रीचे साडेतीन लाख रुपये आणले होते. सदर रक्कम त्यांनी घरातील पेटीमध्ये ठेवली होती. यापेटीतच त्यांच्या कुटुंबातील महिलांचेही दागिने होते. दरम्यान, गुरुवारी रात्री जेवण करून सर्व जण झोपल्यानंतर पहाटेच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडीत झाला. त्यानंतर काही वेळातच चौघे जण घराजवळ आले. त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर एकाने बंदुक काढली तसेच इतरांनी चाकू काढले. आवाज केला तर एके-एकास खतम करून टाकेल अशी धमकी दिली.
७ लाखांचा ऐवज लुटला मात्र माणिक यांचा मुलगा अशोक याने चोरट्यासोबत झटापटीचा प्रयत्न केला. यामध्ये त्याच्या हाताला चाकू लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी चोरट्यांनी सर्वांनाच धमकी देऊन शांत केल्यानंतर माणिक यांच्या जवळून पेटीची चाबी घेतली. त्यात ठेवलेले साडेतीन लाख रुपये रोख व महिलांचे दागिने असा सुमारे ७ लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविला.दरम्यान आज सकाळी माणिक यांनी सेनगाव पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सेनगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक मस्के, शिवसांब घेवारे, जमादार सुभाष चव्हाण, टी. के. वंजारे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर श्वान पथकाला पाचारण केले तसेच ठसे तज्ञ देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. श्वान पथकाला चोरट्यांचा माग काढता आला नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्या अशोक साबळे यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चार पथकांकडून तपास सुरू या प्रकरणात पोलिसांनी तातडीने चार पथके स्थापन करून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न चालु केले असुन काही संशयीतांची चौकशी केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. तर घटनेच्या वेळीच विज पुरवठा कसा खंडित झाला याची माहिती घेतली जात असल्याचे सुत्रांनी सांगितले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List