'मराठीचे मानबिंदू कुसुमाग्रज' प्रेरणादायी पुस्तक
आधुनिक केसरी
मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक म्हणजेच कुसुमाग्रज अर्थात विष्णु वामन शिरवाडकर. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रज यांचे जीवनलहरी (१९३३), विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) व वादळवेल (१९७०) हे त्यांचे काही प्रकाशित काव्यसंग्रह आहेत. यांपैकी ‘विशाखा’ तर मराठी काव्यजगातील मुकुटमणीच मानला जातो. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाने आपली स्वतःची वेगळी अशी काव्यशैली निर्मिली आहे.
कणा, पृथ्वीचे प्रेमगीत, कोलंबसाचे गर्वगीत, क्रांतिचा जयजयकार, प्रेम कर भिल्लासारखं या कवितांचे बोल आजच्या पिढीला ही भुरळ पाडतात. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. कविता, कथा, कादंबरी, लघुनिबंध, नाटक, एकांकिका अशा विविध साहित्यप्रकारात लेखन करून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केलं आहे. त्यांनी लिहिलेलं 'नटसम्राट' हे नाटक आजही तितकेच लोकप्रिय आहे.
शालेय अभ्यासक्रमात मराठी कवी - लेखकांच्या कविता, लेख अभ्यासायला असतात. पण ते लेखक लहानपणी कसे असतील, ते कसे लिहू लागले, त्यांचं बालपण कसे गेले असेल हे प्रश्न मुलांच्या मनात निर्माण होत असतात. मुलांना पुस्तकातील कविता किंवा लेखासोबतच त्या लेखकाचा परिचय करून दिला तर? ही संकल्पना लक्षात घेऊन लेखक नागेश शेवाळकर यांनी 'मराठीचे मानबिंदू कुसुमाग्रज' हे पुस्तक बालदोस्तांसाठी लिहिले. या पुस्तकातून लेखकाने कुसुमाग्रज यांचा जीवनप्रवास थोडक्यात रेखाटला आहे. त्यांचा जन्म, घरातील वातावरण, त्यांचं बालपण, शिक्षण, त्यांचं लेखनप्रवास अगदी सोप्या - सहज शब्दात मांडला आहे. मुळात मुलांना गोष्टी वाचायला आवडतात. तीच आवड लक्षात घेऊन गोष्टीरूपात हा जीवनप्रवास ओघवत्या शैलीत अवतीर्ण झाला आहे. साधी - सोपी रचना, प्रवाही भाषा, मुलांना सहज आकलन होईल अशी, नेमकेपणा यामुळे पुस्तक अधिक प्रभावी झाले आहे. खरेतर एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास कमी शब्दात मांडणं लेखकाला ही अवघड गेले असेल पण एकूण मुलांची मानसिकता, त्यांची आकलनशक्ती याचा विचार करून ही निर्मिती केलेली आहे. विशेष म्हणजे पुस्तकाच्या शेवटी कुसुमाग्रजांच्या ग्रंथसंपदेची यादी सुद्धा दिलेली आहे. मोजकी पृष्ठसंख्या असल्याने अत्यंत कमी वेळात पुस्तक वाचणं सहजशक्य होईल.
या पुस्तकात कुसुमाग्रज उर्फ तात्या यांचं बालपण, त्यांच्यावर वाचनाचे झालेले संस्कार, त्यांची आवड, त्यांचे बालमित्र, शालेय वयातच हस्तलिखिताचे संपादक ते प्रभात चे उपसंपादक म्हणून सांभाळलेली जबाबदारी, इंग्रजी नाटकांचा त्यांच्यावरील प्रभाव, त्यांनी लिहिलेल्या कविता, नाटके त्यामागील त्यांचा वैचारिक आणि सामाजिक दृष्टिकोन या पुस्तकात अनुभवायला मिळेल. त्यांच्या ग्रंथसंपदा, त्यांचे विचार, त्यामागची भावना, सकारात्मकता, त्यांना मिळालेले पुरस्कार याचा लेखाजोखा यात सामावलेला आहे. या पुस्तकाद्वारे कुसुमाग्रजांच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या स्वभावाचे विविध रंग यात दिसून येतात. सगळी मुलं ही सारखीच असतात फक्त त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि संधी मिळाली तर भविष्यात असे व्यक्तिमत्त्व नक्कीच घड़तील. सामान्यातूनच असामान्य व्यक्तिमत्त्व घडत असतात. मुलांना योग्य आणि पूरक, पोषक आणि सकारात्मक वातावरण मिळायला हवे. आपल्या मित्रांसमवेत खोडया करणारे तात्या, पुस्तकात रमणारे तात्या, कविता - लेखक लिहिणारे तात्या, कुसुमाग्रज हे टोपणनाव धारण करणारे तात्या आणि आपल्या लेखणीने मराठी सारस्वतात मानाचं स्थान मिळवणारे कुसुमाग्रज हा त्यांचा विस्मयकारी प्रवास नक्की अनुभवा !
आपल्या मराठी साहित्यातील कवी - लेखक यांची ओळख व्हावी, मुलांवर वाचनाचे संस्कार व्हावे तसेच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, चांगलं व्यक्तिमत्त्व घडावं यासाठी असे आदर्शवत आणि प्रेरणादायी पुस्तक मुलांना जरूर वाचायला द्या ! लेखक नागेश शेवाळकर यांनी अशाच पध्दतीने विविध मराठी कवी - लेखकांचा जीवनप्रवास लिहावा, जेणेकरून मुलांमध्ये कुतूहल निर्माण होत राहील, त्यांना वाचनाची ओढ़ वाटेल आणि मुलांना सुद्धा मराठी साहित्यातील कवी- लेखक यांचा परिचय होईल. अशा साध्या -सरळ लेखनशैलीमुळे नक्कीच मुलं पुस्तकांकडे आणखी आकृष्ट होतील !
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List