चंद्रपूर मनपा मध्ये गटनेता हटाव मोहीम तीव्र; काँग्रेसच्या दोन गटात धोबीपछाड
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : 12/6/2026 चंद्रपूर काँग्रेसमध्ये खासदार धानोरकर आणि आमदार वडेट्टीवार हे दोन गट नेहमीच आमने-सामने येत असतात. दोन गटांमधला तीव्र संघर्ष हा नेहमीच पाहायला मिळतो. या आपसातील वादामुळेच काँग्रेसने हाता तोंडाशी आलेली मनपाची सत्ता घालवली. आता मात्र पुन्हा एकदा चंद्रपूर मनपा गटनेता पदावरून काँग्रेसमध्ये दोन गटात चांगलीच धोबीपछाड होताना दिसते आहे. चंद्रपूर मनपा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या दोन गटांमध्ये आपल्याच नगरसेवकांची पळवा पळवी, त्यांना धमकावणे असे विविध प्रकार चंद्रपूरकरांनी अनुभवले. त्यानंतर दोन्ही गटातील आपसातील भांडणामुळे काँग्रेसने येथील सत्ता गमावली. तर आता मात्र गटनेता पदावरून धानोरकरांनी वडेट्टीवारांना चांगलाच घाम फोडल्याचे चित्र दिसत आहे. सध्या गटनेता पदावर असलेले राजेश अडुर हे वडेट्टीवार गटाचे आहेत. आणि त्यांना या गटनेता पदावरून हटविण्यासाठी काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंग बांधल्याचे चित्र दिसते आहे. यातूनच काँग्रेसचे काही नगरसेवक मान्सून पर्यटनाला गेले असून वडेट्टीवर गटाचे पाच नगरसेवक धानोरकरांच्या गळाला लागल्याचे चित्र आज तरी दिसते आहे.
गटनेतेपद आपल्या समर्थकाला मिळावे यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर या सुरुवातीपासूनच आग्रही होत्या. त्यांच्या या आग्रहाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे. खासदार धानोरकर यांच्या १५ समर्थकांसह वडेट्टीवार गटाचे ५ नगरसेवक असे एकूण २० नगरसेवक अज्ञातस्थळी पर्यटनाला रवाना झाले आहेत. आणि सगळ्यांचे भ्रमणध्वनी सुद्धा बंद झालेले आहेत. धानोरकरांकडे आता संख्याबळ जास्त असल्याने त्यांनी गटनेता बदलण्याची पूर्ण तयारी केल्याची जोरदार चर्चा आहे. धानोरकरांनी केलेल्या या वारामुळे वडेट्टीवार गटामध्ये मात्र चांगलीच उलथापालथ माजलेली आहे.
आपले उर्वरित नगरसेवक सुरक्षित ठेवण्यासाठी वडेट्टीवार समर्थकांनी नगरसेवकांची तातडीने बैठक घेतली आणि तेही आता 'देवदर्शन'च्या नावाखाली शहराबाहेर रवाना झाले आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर विद्यमान गटनेते राजेश अडूर यांनी अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. "मी दलित समाजाचा असल्यानेच मला या पदावरून हटवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत," असा खळबळजनक सनसनाटी आरोप राजेश अडुर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता या अंतर्गत वादाला जातीय वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून काँग्रेस हायकमांड यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजारा नंतर आता गटनेता पदावरून घोडेबाजार सुरू होईल का? आणि धानोरकरांचा " वार " योग्य जागी लागून त्यांच्या गटाला गटनेता पद मिळणार का? की राजकारणात मुरब्बी व अनुभवी असलेले वडेट्टीवार धानोरकरांचा वार परतवून लावण्यात यशस्वी होईल ? याची चांगलीच चर्चा आता चंद्रपूरमध्ये रंगायला लागली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List