कांदा उत्पादक शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार : हर्षवर्धन सपकाळ
कांद्याला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचा विराट क्रांती महामोर्चा, पुणे नाशिक महामार्ग रोखला
आधुनिक केसरी न्यूज
पुणे : मुंबई दि. २ जून २०२६ शेतक-यांनी रक्ताचे पाणी करून मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा कवडीमोल दराने विकावा लागत आहे. कांद्याला प्रति किलो दोन रुपयेही दर मिळत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव व शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष व महाविकास संघर्ष करत राहील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा, कमी भावात विकलेल्या कांद्याला इमुदान द्यावे, शेतक-यांचा सर्व कांदा नाफेडमार्फत खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा विविध मागण्यांसाठी आज महाविकास आघाडीने पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदेलन केले. पोलिसांकडून धरपकड सुरु असतानाही हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, खा. निलेश लंके, आ. बापूसाहेब पठारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळे, माजी आ. अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, वाढती महागाई, शेती उत्पादनाचा वाढलेला खर्च आणि शेतमालाला मिळत नसलेला योग्य भाव यामुळे राज्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत असून बाजारात कांद्याचे दर घसरल्याने त्यांना उत्पादन खर्चही वसूल होतं नाही. सरकारने कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही. कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. खरेदी प्रक्रियेत व्यापाऱ्यांचा फायदा करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे आणि त्यांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकरी संकटात असताना सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने ग्रामीण भागात मोठी नाराजी आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव आणि दिलासा मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरू राहील, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List