तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें ।
आधुनिक केसरी
मानवाच्या जान्मापासूनचा इतिहास पहिला असता, विचारांनीच ओतप्रोत भरलेला दिसून येईल ! ज्याप्रमाणे एखादा अमृतकलश पूर्णतः भरलेला असून त्यातील एक थेंब सुद्धा वाया जात नाही, त्याप्रमाणे संपूर्ण जगताचा मानवी इतिहास सद्विचारांनी आणि नित्य नित्य प्रवाही राहिला आहे ! आदि मानवापासून ते आजतागायत इथे प्रत्येकाने आपला नवा विचार व्यक्त करून पुढील पिढ्यांना मार्गदर्शन केलेले आढळून येईल. याच आधारे अगदी इसविसन पूर्व कालखंडातील भारतीय तत्वज्ञ असो की; पाश्चिमात्य विचारवंत असो, सर्वानीच आपले अनमोल विचार खापर, विहार, लेण्या, मंदिर, अलंकार, शिलालेख, ताम्रपट, मूर्ती, अभिलेख, मानव-प्राण्यांची हाडे इत्यादी साधनांच्या आधारे आपले विचार कोरून अथवा लिहून ठेवलेले आढळतात. बदल या काळाच्या नियमाप्रमाणे साधने बदलत गेली, माणसे बदलत गेली मात्र त्यांची मानव कल्याणार्थ विचार व्यक्त करण्याची प्रवृत्ती समान राहिली हे विशेष ! त्याच न्यायाने ज्ञान आणि विचार वाणी द्वारा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे स्त्रवत राहिले आणि लेखनाच्या माध्यामतून त्याचे चिरकालत्व टिकत राहिले. मात्र विचार आजतागायत जिवंत राहिला हे विशेषतः विशेष आहे ! त्यात सज्जन-दुर्जन संघर्ष हा सातत्याने चित्रित झाला असून माणसाने सर्वकाळ सज्जन माणसांचीच पाठराखण केलेली आढळून येते. आपल्याला दुर्जनाचा तात्पुरता विजय झालेला जरी दिसत असलं तरी सज्जनत्व अमर राहिलेले निदर्शनास येते हे दुर्लक्षून चालणार नाही.
धृष्टं धृष्टं पुनरपि पुनः चन्दनं धृष्टं धृष्टं पुनरपि पुनः चन्दनं चारुगन्धं
छिन्नं छिन्नं पुनरपि पुनः चेक्षुदण्डं रसालम् ।
दग्धं दग्धं पुनरपि पुनः कांचनं ताप्तवर्णम्प्रा
णान्तेऽपि प्रकृतिविकृति र्जायते नोत्तमानाम् ॥
म्हणजे ज्याप्रमाणे चंदन कितीही घासले तरी सुगंधित होते, उसाचे कितीही तुकडे केले तरी त्याची गोडी कायम राहते, अग्नी पुनःपुन्हा प्रज्वलित केला असता आणखी तेजोमय होतो किंवा सूर्यासमोर कितीही काळेकुट्ट ढग आले तरी सूर्य आपले स्थान सोडत नाही त्याप्रमाणे सज्जन माणसांवर कितीठी आघात झाले, हजारो संकटे आली तरीही सज्जन आपल्या सद्गुनांपासून तसूभर सुद्धा ढळत नाही. महात्मा विदुर आपल्या विदुरनीति या ग्रंथात सदाचारी मनुष्याची लक्षणे सांगतांना "परस्य पीडया लब्धं धर्मस्योल्लंघनेन च आत्मावमानसंप्राप्तं न धनं तत् सुखाय वै" म्हणजे दुसऱ्यांना दु:ख देऊन किंवा अधर्म वृत्तीने कमावलेल्या धन-संपत्तीने कधीच सुख-शांती-समृद्धी प्राप्त होत नाही किंवा महाभारतात दुर्योधन धर्म-अधर्म काय आहे (?) हे मी जाणत नाही असे म्हटल्यावरसुद्धा पांडुपुत्र धर्म दुर्योधनाला "अकॄत्वा परसन्तापं अगत्वा खलसंसदं अनुत्सॄज्य सतांवर्तमा यदल्पमपि तद्बहु" म्हणजे दुसऱ्यांना दु:ख न देता, दुष्ट लोकांसोबत आपले संबंध प्रस्थापित न करता माणसाने आपल्या मानवधर्म या मार्गावरच चालावे असा उपदेश करतात. म्हणजे हा सज्जन -दुर्जनाचा संघर्ष अनादी आहे यात तिळमात्र शंका नाही.
याच अनुषंगाने सतराव्या शतकांत अत्यंत खडतर परिस्थिती आणि मानवी उपद्रवाच्या अनंत काठ्या अंगा-खांद्यावर झेलून संत तुकारामांनी आपले सज्जनत्व अबाधित ठेवतांना हा अभंग लिहितात.
लगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥१॥
अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ध्रु.॥
सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हुन ॥२॥
तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥३॥ (शा.अ.गाथा अ.क्र. 289)
म्हणजेच कितीही गर्द झाडीत चंदन असले तरीही चंदन आपला उपजत सुगंधी गुणधर्म कधीच सोडत नाही. चंदन, मग ते लिंबाच्या झाडाच्या शेजारी असो की काटेरी बाभळीच्या, चंदन आपला सुगंध गुणधर्म कधीच सोडत नाही हे विशेष ! यासाठी चंदन काही विशेष किंवा वेगळे प्रयत्न करत नसून तुकोबाराय "अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना" ह्या अजरामर अभंग-ओळी लिहून चंदनाचा उपजत गुणधर्म विषद करतात. त्याचबरोबर पुढील चरणात "सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हुन" या ओळी लिहून सज्जन माणसाची तुलना अगदी सुर्यासोबत करतांना दिसतात. तसेच मेघ दाटून आले की; मोर आपला सुंदर पिसारा फुलवतो आणि आपल्या विहंगम नृत्याने संपूर्ण सृष्टी प्रफुल्लीत करून सोडतो. याच अनुषंगाने तुकोबाराय हा एक अभंग लिहून सज्जनाचे गुण वैशिष्ठ्ये सांगतात.
चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥
दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साकर अवघी गोड ॥ध्रु.॥
तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळे चि ना ॥२॥ (शा.अ.गाथा अ.क्र. २९०)
हे दोन्ही अभंग महाराष्ट्र शासनाच्या तुकाराम गाथ्यात एकानंतर एक आहेत, याचा अर्थ हे दोन्हीही अभंग एकदाच लिहिलेले आहेत असा होत नाही. संत तुकोबांच्या गाथ्याचे अनेक वेळा संशोधन होऊन विविध तज्ञ अभ्यासकांनी तयार केलेले आहेत. त्या सर्वच संशोधकांनी हे दोन अभंग एकानंतर एक लिहून वाचक-चिंतकांना सहजतेने उपलब्ध करून दिले आहेत.
दुसरा अभंग सुद्धा सज्जन माणसांची लक्षणे व्यक्त करणारा असून त्याची तुलना करतांना तूकोबांनी विविध रूपके आणि उपमा यांचा वापर करून चित्रित केली आहेत. ज्याप्रमाणे परीस, दिवा, साखर यांचा एकही भाग वेगळा करून त्याचा गुणधर्म वेगळा करता येत नाही त्याप्रमाणे सज्जन व्यक्तीमध्ये शोधून सुद्धा एकही दोष किंवा दुर्गुण आढळून येत नाही. असे अभंग लिहून तुकोबा हे कालातीत लेखक असून त्यांचे तत्वज्ञान आणि जीवनाकडे पाहण्याचा वैश्विक दृष्टीकोन किती विशालकाय होता हे प्रकर्षाने लक्षांत येते. त्यांचे हे लिखाण म्हणजे सहजतेने लोकानुभव घेत घेत ते आपे कार्य करत राहतात. हे कालातीत वाङ्मय सर्वकाळ पथदर्शी आहे हे आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. तुकोबांची गाथा म्हणजे वाचकांना जणू पर्वणीच आहे. इथे दुर्जनांचे दोष आणि सज्जनांचे सद्गुण वर्णन करून सर्वांनाच सर्वकाळ विचाराची मेजवानी देण्याचा महान अविष्कार या गाथ्यात केलेला आढळून येतो.
हे दोन्ही अभंग आणि त्यातील तुकोबांनी व्यक्त केलेल्या सज्जन माणसाच्या लक्षणांचे सिंहावलोकन केले असता, तुकोबा कोणत्याही शाळेत न जाता त्यांनी अगोदरच्या सर्वच ग्रंथांचा धांडोळा घेतला असला पाहिजे, परिणामी त्यांचे विचार हे विविध संस्कृत सुभाषिते, विदुरनीती आणि महाभारतातील अनेक वचनांशी मेळ खातांना त्यांचे विचार आणि अभ्यास हा सार्वकालिक होता हे प्रकर्षाने जाणवते. तुकोबा आपली अभंगानुभूती व्यक्त होतांना त्यांच्या समोर सकल मानवजातीचे कल्याण हाच उदेश होता. त्यांचे हे अभंग आपण नित्य व्यवहारात उपयोगी आणले पाहिजे. त्यांच्या ह्या दोन अभंगातील विविध विचारांचा आढावा घेतला असता सज्जन माणूस हा सूर्य, चंदन, मेघ, परीस आणि दिपकापेक्षाही श्रेष्ठ असून त्याच्या अस्तित्वाने त्याचा भोवताल नित्य आनंदी असतो. आपल्या सद्गुणांनी सद्विचारांची पेरणी करून मेघ दाटून आल्यानंतर मोर नाचून आनंद व्यक्त करतो ! तसे सज्जनाच्या सहवासाने संपूर्ण श्रुष्टी प्रफुल्लीत होत असते. सज्जन हा परीसासारखा असून आपल्या स्पर्शाने आपला परिसर सुवर्णांकित करत असतो. कुणी परीस पहिला का नाही (?) या प्रश्नाचे उत्तर अनिश्चित असतांना एक सज्जन माणूसमात्र परीसापेक्षा मोठे काम करू शकतो याची शाश्वती सज्जनाच्या अस्तित्वाने जाणवते.
वर्तमानात तुकाराम नीतीचा विचार करतांना सर्वत्र एकल कुटुंब व्यवस्था प्रवाही झाली आहे. आजी-आजोबा ही नाती दुर्मिळ होतांना माणसाच्या घराचं संस्कार केंद्र होणं अपेक्षित आहे. प्रत्येकाने स्वतःमध्ये सज्जनांचे अस्तित्व प्रवाही करून आपल्या भोवतालचा परिसर आनंदी करणे ही काळाची गरज बनली आहे. आज या अभंगाचे आपण सर्वांनी अवलोकन करून आपल्यामध्ये सज्जनत्व प्रवाही रहावे आणि सर्वकालीन माणूस सज्जन राहणे अत्यावश्यक आहे. तेंव्हा तुकाराम नीती या सदरांतर्गत हे अभंग चर्चेला घेऊन त्यांना आपल्या दैनंदिन त्याचे पालन करणे अपेक्षित आहे. आज आपण या अभंगांचे अवलोकन करून स्वतःमध्ये आणि समाजामध्ये हे विचार प्रणे अत्यावशक आहे. चला तर मग, ह्या तुकाराम नीती अंतर्गत आपणही स्वतःमध्ये हे विचार प्रवाही करून माणसाचे विचारच परीस करून आनंदी राहुयात ! जय तुकोबाराय !
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, लेखक, प्रबोधनकार, प्राणायाम प्रशिक्षक आहेत)
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List