लोक जैसा ओक धरितां धरवेना
तुकाराम नीती भाग : ९
आधुनिक केसरी
प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये , कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ जि.परभणी (महाराष्ट्र) , मो. 9158064068
लोककवी तुकोबाराय म्हणजे सहज बोलत बोलत समाजाच्या सर्वांगीण हिताचा विचार करून उपदेश करणारे सामांन्यातून सर्वमान्य झालेले असामान्य व्यक्तिमत्व ! लोकांचा लोकधर्म जवळून निरखणारे तुकोबा म्हणजे महान समाज सुधारक ! कोणत्याही शस्त्र-अस्त्राविना समाजाच्या सर्वांगाचे पोस्टमार्टेम करून सडेतोड विश्लेषण करणारे अलौकिक रसायन, शास्त्रज्ञ म्हणजे संत तुकाराम ! त्यांचे अभंग वाङ्मय ही एक विशालकाय वास्तू असून दैनंदिन समाज व्यवहाराचे चिंतन-मंथन याच वास्तुद्वारे तुकोबांकडून सदोदित होत आले आहे. सर्वसामान्य माणसांचे जगणे आडमार्गाने जात असतांना संत-वचने योग्य मार्ग दाखविण्याचे कार्य करतांना वाटेतील भेदाचे आणि अज्ञानाचे काटे बाजूला सारण्याचे काम सर्वच संतांनी केले आहे. देव-ईश्वर आदि संकल्पना स्पष्ट करतांना तुकोबा त्यांच्याशी सरळ संवाद साधतांना दिसतात. त्यांचे लेखन-प्रबोधन हे दैनंदिन जीवन आणि व्यवहार याचा परस्पर संबंधाचा मेळ बसवून आपले प्रबोधन-बीज समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्कार्य तुकोबा सहजतेने करतांना दिसतात. अगदी याच प्रकारे संत कबीरजी आपल्या दोह्यामधून प्रबोधन करतांना लोकांना सहजच उपदेश करतात.
जहाँ दया तहा धर्म है, जहाँ लोभ वहां पाप ।
जहाँ क्रोध तहा काल है, जहाँ क्षमा वहां आप ।
असे दोहे लिहून समाजाला खरी ईश्वरानुभूती करून देण्याचं काम संतांनी केलं. धर्म आणि तत्ससंबंधी विचार प्रकट करतांना कबीरांनी दया-क्षमा आणि राग-लोभ याचा पाप-पुण्य या दोन संकल्पना स्पष्ट करून लोकांना उपदेश केला आहे. अगदी याच अनुषंगाने समाजातील माणसांचा दैनंदिन लोकव्यवहार कसा स्वार्थी आणि संकुचित आहे याचे सुंदर विवेचन तुकोबाराय या अभंगातून करतात.
ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥१॥
संसार करितां म्हणती हा दोषी । टाकितां आळसी पोटपोसा ॥ध्रु.॥
आचार करितां म्हणती हा पसारा । न करितां नरा निंदिताती ॥२॥
संतसंग करितां म्हणती हा उपदेशी । येरा अभाग्यासि ज्ञान नाहीं ॥३॥
धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा । समर्थासि ताठा लाविताती ॥४॥
बहु बोलों जातां म्हणति हा वाचाळ । न बोलतां सकळ म्हणती गर्वी ॥५॥
भेटिसि न वजातां म्हणती हा निष्ठुर । येतां जातां घर बुडविलें ॥६॥
लग्न करूं जातां म्हणती हा मातला । न करितां जाला नपुंसक ॥७॥
निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ । पातकाचें मूळ पोरवडा ॥८॥
लोक जैसा ओक धरितां धरवेना । अभक्ता जिरे ना संतसंग ॥९॥
तुका म्हणे आतां ऐकावें वचन । त्यजुनियां जन भक्ति करा ॥१०॥(शा.अ.गाथा अ.क्र. २५९)
लोकमत आणि त्याचे विविध पैलू तुकोबांच्या या अभंगातून स्पष्ट होतात. समाजाचे दुटप्पी व्यवहार तुकोबा या अभंगातून सांगतांना त्यांना आलेले अनुभवच त्यांनी या अभंगाद्वारा विषद केले आहेत. समाजाने आतापर्यंत कोणत्याच माणसाला दुषणे दिल्याशिवाय सोडले नाही. तुकोबाराय लौकीकाविषयी या अभंगामध्ये मोठ्या सहजतेने लिहून अपना सर्वांना जागृत करून लोकधर्म विषद करतात. लोकव्यवहार मोठा विचित्र असून कोणतीच गोष्ट समाज माणसाला करू देत नाही. संसार करणाऱ्या माणसाला हा कोशात अडलेला किडा आहे, आणि जर त्याने संसार केला नाही तर त्याला हा निव्वळ भुईला भार आहे असे म्हणतात. एखाद्याने धर्माचे व्यवस्थित आचरण केल्यास याने पसारा वाढवला आहे म्हणतात, तर कोणतेच आचरण केले नाही तर हा आचरणभ्रष्ट आहे असे म्हणून समाज हिणवत राहतो. एखादा संतांच्या संगतीने राहिला तर हा उपदेशी आहे, आणि संतसंग केला नाही तर मूर्ख आहे अशी दुषणे लावतील. लोक गरिबाला कपाळ करंटा तर श्रीमंताला अहंकारी म्हणून संबोधतात. एखादा माणूस बोलका आहे म्हणून त्याला बडबड्या म्हणतील, तर एखादा मितभाषी असेल त्याला गर्विष्ठ म्हणून बोलावतील. एखादा माणूस नातेवाईकांच्या भेटीला गेला नाही तर निष्ठुर म्हणतील आणि वारंवार जायला लागला तर येता-जाता घर बुडव्या म्हणून चिडवतील. एखाद्याने लग्न केले तर माजला म्हणतील आणि नाही केले तर नपुंसक म्हणून त्याला दोष देतील. एखाद्याला मुलं-बाळ नसेल तर निपुत्रिक म्हणतील, जास्त मुले असतील तर पोरवडा वाढवून ठेवला म्हणतील. हा सगळा लोक व्यवहार पाहून तुकोबाराय व्यथित होतात आणि या सर्व लोकव्यवहाराला 'ओकारी' ची उपमा देतात, ज्याप्रमाणे माणसाला आलेली उलटी थांबवून ठेवता येत नाही त्याप्रमाणे लोकव्यवहार रोखून किंवा थांबवून जीवन जगणे कुणालाही शक्य नाही, तसा अभक्त माणसाला संतसंग सहन होत नाही. तेंव्हा यावर सरळ-सोपा उपाय म्हणजे 'ऐकावे जणाचे आणि करावे मनाचे' या म्हणीप्रमाणे आपण लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला योग्य वाटेल तेच करावे असा सल्ला तुकोबाराय आपणांस देतात.
प्रत्येक वाचकाने हा अभंग अत्यंत काळजीपूर्वक वाचवा, कारण आज आपण सर्व मिडीयावर वावरत आहोत आणि त्यावेळी कोण काय प्रतिक्रिया देतो याकडे सावधपणे पाहणे गरजेचे आहे. आजसुद्धा हा अभंग आपणास तंतोतंत मार्गदर्शक ठरतो. या अभंगातून आपण माणसांची माणसाकडे पाहण्याची नजर कशी आहे (?) हे लक्षांत येते. जीवनामध्ये कोणतीही कृती करतांना सद्सदविवेक जागृत ठेवून विचार आणि कार्य करणे गरजेचे आहे. विवेक माणसाला पथभ्रष्ट होऊ देत नाही. तेंव्हा हा अभंग वर्तमानात असो किंवा भविष्यकाळात असो, अत्यंत कळीचा आहे. सर्वत्र प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांचे वारूळ उठलेले असतांना हा अभंग बुडत्याला सुकाणूचा आधार होऊन आपल्यासोबत उभा आहे. तुकोबांचा हा अभंग सर्वकाळ सोबत ठेवण्यासारखा आहे, याचे कारण म्हणजे आपण सर्वजण 'सबसे बड़ा रोग, क्या कहेंगे लोग' यामध्ये गुरफटलेलो असतांना आपल्याला सामान्य माणसांचा गुणधर्म लक्षांत घ्यावा लागेल. सामान्य माणूस कुणाविषयी काय चर्चा करतो (?) हे महत्वाचे असून त्याच अनुषंगाने हा अभंग अत्यंत महत्वाचा आहे.
आज तुकारामनीती अंतर्गत विवेचनाकरिता घेतलेला अभंग हा दहा चरणांचा असून हे दहा चरण म्हणजेच पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कामेंद्रीये यांना मार्गदर्शक आहे. संत-विचारवंत हे त्रिकालात विचार करून त्यापलीकडचे चिंतन आपल्या लेखणीद्वारे निर्माण करून ठेवत असतात. त्यांना कोणताही काळ हा बंधनात ठेऊ शकत नाही. आज या विचारांची नितांत आवश्यकता असून दैनंदिन जगणे हे मोठे आवाहनात्मक झाले असतांना आपण लोकांच्या प्रतिक्रियांकडे सहजतेने पाहून, त्यांचा साधक-बाधक विचार करून जीवन व्यतीत करणे क्रमप्राप्त ठरते. आज भोवताल पाहत असतांना सर्वच गोष्टींचे स्तोम वाढले आहे. योग्य-अयोग्य याची निवड करणे कठीण होऊन बसले असतांना आपल्याला हा अभंग पथदर्शी ठरतो आहे. संत तुकोबांच्या या अभंगाकडे पहिले असता आपल्या हे लक्षात येते की; तुकोबाराय केवळ भजन-पूजन करणारे वारकरी नव्हते, तर त्यांनी आपल्या विचारांच्या फाळाने येथील जमीन भुसभुशीत करून सामान्य लोकमतांची खोलवर नांगरणी केलेली दिसून येते. माणसांचे सामान्य गुणधर्म तुकोबा सहजतेने लिहून जागृती करत गेले आणि आजही करत आहेत. त्यांच्या अभंगांचा हा अनमोल ठेवा सर्वकाळ-सर्वांना मार्गदर्शक असून आपण सर्वानीच त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे आणि जीवन आनंदी करणे क्रमप्राप्त आहे.
आज सगळीकडे धर्म-जात-रंग अन कट्टरतेचे वादळ उठले असतांना, भरकटलेल्या जीवन नौकेला तुकोबांचे अभंग होकायंत्राच्या रूपाने मार्गदर्शक ठरणारे आहेत. आजचा लोकव्यवहार त्यांच्या या अभंगातून आपल्यासमोर येत असून लोक काय प्रतिक्रिया देतात याचे अवलोकन करावे आणि नंतरच अपण त्याचा साधक-बाधक विचार करून आपल्या जीवनात ते अंगीकारावे. असे झाले की मगच खऱ्या अर्थाने या अभंगाचे सार्थक होणार आहे. नाहीतर समाजाच्या सर्वच प्रतिक्रिया गांभीर्याने घेतल्यास आपल्यावर 'गाढव नदीत फेकून पश्चाताप करणाऱ्या बापलेकासारखी' वेळ येईल आणि कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. 'तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले' अशी वेळ येऊ नये यासाठी नित्य जागृत असणे अत्यंत गरजेचे आहे. तेंव्हा चला तर मग आपण आपले वर्तन सुधारून घेऊ आणि लोकांच्या प्रतीक्रीयाकडे डोळे झाकून न पाहता तसेच त्यांना आपल्या जीवनाला लावून न घेता आपले जीवन विवेक-विचाराने पूर्ण करून घेवूयात! हाच महत्वपूर्ण संदेश तुकोबा या अभंगाद्वारा देतात आणि तो आपण अंगीकारून जीवन सफलतेच्या मार्गाने पुढे घेऊन जाऊयात !
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, प्रबोधनकार, प्राणायाम प्रशिक्षक आहेत)
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List