तुकाराम नीती ( भाग : ७ ) तुका म्हणे खळ | म्हणोनिया निषिद्ध तो ||

तुकाराम नीती ( भाग : ७ )             तुका म्हणे खळ | म्हणोनिया निषिद्ध तो ||

संत आणि विचारवंत सातत्याने समाजाचे उत्थान कसे होईल (?) यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात. विश्वाच्या निर्मितीपासून आतापावेतो फक्त विचारवंत आणि प्रबोधन करणाऱ्या लोकांचीच इतिहास नोंद घेत आलेला आहे. कवी, लेखक, व्याख्याते, विचारवंत, प्रबोधनकार आदि लोकांच्या वैचारिक शिदोरीवर समाजाचे भरण पोषण होत असते. हे महापुरुष वेगवेगळ्या पद्धतीने समाजाची कान उघडणी करतांना आपल्या भोवतालची परिस्थिती पाहून आपले… Continue reading तुकाराम नीती ( भाग : ७ ) तुका म्हणे खळ | म्हणोनिया निषिद्ध तो ||


संत आणि विचारवंत सातत्याने समाजाचे उत्थान कसे होईल (?) यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात. विश्वाच्या निर्मितीपासून आतापावेतो फक्त विचारवंत आणि प्रबोधन करणाऱ्या लोकांचीच इतिहास नोंद घेत आलेला आहे. कवी, लेखक, व्याख्याते, विचारवंत, प्रबोधनकार आदि लोकांच्या वैचारिक शिदोरीवर समाजाचे भरण पोषण होत असते. हे महापुरुष वेगवेगळ्या पद्धतीने समाजाची कान उघडणी करतांना आपल्या भोवतालची परिस्थिती पाहून आपले प्रबोधन कार्य करत असतात. कधी कधी संत हे सहज साध्या भाषेत उपदेश करतांना दिसतात, परंतु त्यांच्या उपदेशाची परिणामकारकता जेवढी असावी तेवढी दिसून येत नाही तेंव्हा ते आपल्या शब्दांची पातळी खाली आणून, प्रसंगी शिव्या देऊन समाजाचे कल्याण करण्याचे प्रयत्न करत असतात. समाजाची अवस्था पाहून ते व्यथित होतात आणि ‘बुडते हे जन, न देखवे डोळा’ अशी त्यांची अवस्था होते. संत एकनाथ महाराज ईश्वराचे भजन म्हणजेच स्वत:च्या उत्थानाची काळजी नसणाऱ्या लोकांना आपल्या हरिपाठातून काय उपदेश करतात ते पहा.
भक्तिवीण पशू कशासी वाढला । सटवीनें नेला कैसा नाही ॥१॥
काय माय गेली होती भूतापाशी । हरी नये मुखासी अरे मूढा ॥२॥ (एकनाथ हरिपाठ ९)
असे अभंग लिहून तत्कालीन समाजाचे प्रबोधन केले. अगदी याच आशयाचे बरेच अभंग संत तुकोबाराय लिहतांना दिसतात. मूलतः तुकोबांनी आपल्या अभंग रचना समाजाचे सर्वांगाने प्रबोधन होऊन सामान्य माणूस विवेक-विचारांचा पाईक व्हावा. त्याने कोणत्याही कर्मकांडांना बळी न पडता आपल्या सर्वांगीण हिताचा विचार करावा यासाठी तुकाराम वेगवेगळे दृष्टांत आणि त्या आधारे सिद्धांत देतांना दिसतात.
संत तुकारामांचा काळ असो की वर्तमान असो, समाजात आणखी सुद्धा वंशाला दिवा म्हणजे पोटी मुलगाच हवा अशा हव्यासापोटी अनेक स्त्रियांचा स्त्रियांकडूनच छळ होतांना दिसत असतो. प्रचंड प्रमाणात स्त्री-भ्रूण हत्या झाल्या असून अजून सुद्धा कुठे कुठे चोरून गर्भपात करणारे डॉक्टररुपी राक्षस समाजामध्ये निदर्शानांस येत असतात तर अनेक नराधम डॉक्टरांना कैद देखील झाली आहे. तेंव्हा मुलगा-मुलगी हा भेद योग्य नसून दोन्हीही समान आहेत याचे प्रबोधन मागील अनेक वर्षांपासून झाले आहे आणि होत आहे. याच अनुषंगाने पुत्ररत्न मोहात पडलेली आई, पुत्र झाल्यानंतर होणारा आनंद आणि शेवटी त्याने जगण्याची केलेली वाताहत तुकोबाराय या अभंगातून विषद करतात.
देखोनि हरखली अंड | पुत्र झाला म्हणे रांड | तंव तो जाला भांड | चाहाड चोरटा शिंदळ ||१||
जाय तिकडे पीडी लोकां | जोडी भांडवल थुंका | थोर झाला चुका | वर कां नाहीं घातलीं ||२||
भूमि कांपे त्याच्या भारें | कुंभपाकाचीं शरीरें | बोले निष्ठुर उत्तरे | पाप दृष्टी मळिण चित्त ||३||
दुराचारी तो चांडाळ | पाप सांगाते विटाळ | तुका म्हणे खळ | म्हणोनिया निषिद्ध तो ||४|| (शा.अ.गाथा अ.क्र. 71)
मोठ्या अपेक्षेने पोटी मुलगा यावा म्हणून नवस-सायास करणाऱ्या आईची तिच्या पुत्रांवर योग्य संगोपन आणि सुसंस्कार न झाल्यामुळे त्या मुलाची होणारी अवस्था तुकोबाराय या अभंगात लिहितात. पोटी मुलगा सद्गुणी यावा यासाठी आई-वडील यांना अनन्यसाधारण महत्व असून जर आई-वडील योग्य नसतील तर काय होते ?
उन्मादो मातृदोषेण पितृदोषेण मूर्खता |
अदाता वंश दोषेण कर्मदोषा दरिद्रता ||
हे सुभाषित वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की; आईच्या दोषामुळे संतती क्रोधी तर वडिलांच्या दोषामुळे मूर्ख जन्मते, वंश दोषाने कृपण आणि कर्म दोषाने दरिद्रता येऊ शकते. या न्यायाने एखाद्याच्या पोटी जरी मुलगा जन्मला परंतु तो जर भांडकुदळ, चुगलखोर, चोरी करणारा किंवा व्यभिचारी निघाला तर ? त्यानंतर तो पुत्र काय काय प्रताप करू शकतो याची यादीच संत तुकाराम देतात ! अशी माणसं जिकडे जातील तिकडे लोकांना त्रास देतात, त्याच्याकडे पाहून अक्षरशः लोक थुंकतात ! आणि मग पुत्र झाला म्हणून मिरवणाऱ्या आईला वाटते की; असा कुपुत्र जन्मण्याऐवजी माझा गर्भपात का झाला नाही ? याच अनुषंगाने संत तुलसीदास ‘जिनके हृदय हरी नाम बसे’ या अभंगामध्ये लिहितात,
जिन काम किया परमार्थ का । तिन हाथ से दान दिया ना दिया ।।
जिन के घर एक सपूत भयो । तिन लाख कपूत भया ना भया ।।
म्हणजे महात्मा गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारखा एकच पुत्र किंवा पुत्री हवी, बाकी लाख कुपुत्रांची गरज नाही. कारण अशा कुपुत्रांमुळे संत तुकोबाराय लिहितात, ‘भूमि कांपे त्याच्या भारें | कुंभपाकाचीं शरीरें | बोले निष्ठुर उत्तरे | पाप दृष्टी मळिण चित्त’ पृथ्वीसुद्धा थरथर कापते. अशा कुपुत्राचे शरीर म्हणजे दोषांचे भांडार असून लोकांना बोलतांना सुद्धा हा त्रासदायक बोलत असतो. त्याची दृष्टी आणि मन सुद्धा घाणेरडे असते. तो फक्त लोकांना त्रास कसा होईल (?) याचाच वारंवार विचार करतो. अशा माणसाला तुकोबाराय दुराचारी, चांडाळ अशी दुषणे लावून शेवटी ‘तुका म्हणे खळ | म्हणोनिया निषिद्ध तो’ हे अर्धे चरण लिहून तो सर्वांसाठी निषिद्ध आहे. तोच सर्वांत मोठा खळ म्हणजे मूर्ख-समाजकंटक-दोषी आहे असे सांगतात.
संत तुकोबांच्या सदरील अभंगाचे बारकाईने निरीक्षण केले असता, तुकोबाराय सर्व माणसांना जागे करण्याचे काम करतांना दिसतात. त्यांचे अभंग हे सार्वकालिक आणि लोकांना आपलेसे का वाटतात ? याचे मुख्य कारण म्हणजे ते लिहितांना कोणतीही भीड-भाड ठेवत नाहीत. सतराव्या शतकांत लोकांना नीती-तत्वांचा उपदेश करतांना, नक्कीच तत्कालीन लोक लिंगभेद करत असावेत आणि तो आजही चालूच आहे. हाच वैश्विक विचार तुकोबांसमोर असला पाहिजे. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देतांना एखाद्या आईने मुलगी झाली म्हणून दु;खी होऊ नये किंवा मुलगा झाला म्हणून हुरळून जाऊ नये असे सांगायचे आहे ! त्यापुढे जाऊन ते सांगतात की; आपल्या संततीला योग्य संस्कारित करून सन्मार्गी लावावे. असे झाले तरच तो मुलगा किंवा मुलगी माणूस म्हणून योग्य काम करेल. त्याचा आई-वडिलानांच काय ‘तयाचा हरिख वाटे देवा !’ म्हणून लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन समाजाने सर्वसमावेशक आणि सार्वकालिक विचार करणे गरजेचे आहे.
याशिवाय हा अभंग प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि त्यातील आपल्यात कुपुत्राचे कोणकोणते दोष आहेत याचा खोलवर विचार करावा. नुसता विचारच करून चालणार नाही तर, त्यापैकी एखादा दोष आपल्यामध्ये असेल तर वेळीच सावध होऊन त्या दोषाला आपल्या बाहेर हाकलून द्यावे, कारण आज सर्वत्र विचित्र वातावरण दिसते आहे. जशी माणसं दिसतात तशी वागतांना दिसत नाहीत. माणसं दिसायला अगदी गोड, कडूवृंदावनासारखी अप्रतिम, सुंदर दिसतात परंतु मधून कडू आणि विषारी असतात ! उलट माणसं बाहेरून फणसासारखी असली तरी चालतील, परंतु आतून मधाळ, मधुर असावीत ! याशिवाय माणसाने अगदी सफरचंद किंवा आंब्यासारखे असावे ! आंबा जसा दिसायला पिवळाधमक, सुंदर दिसतो, सुगंधही छान येतो त्याचबरोबर आतमध्ये गोड रस असतो ! एकच फळ जसे पंचज्ञानेंद्रियांना सुख प्राप्त करून देते, अगदी तसे माणसाने दर्शनी-वर्तनी आणि कथानिद्वारे स्वतःला सुंदर बनवावे. ही सर्वच नको असलेली तत्वे जसे की; भांडकुदळपणा, चुगलखोरपणा, चोरी करणे, व्यभिचारीवृत्ती, लोकांना टाकून बोलणे, पापी नजर असणे ही दुषणे सर्व स्त्री-पुरुषांनी टाकून देऊन सर्वार्थाने स्वतः आनंदी राहून संपूर्ण विश्व आनंदित करण्यासाठी प्रयत्नरत राहणे गरजेचे आहे. सर्वच स्त्री-पुरुष जर असे वागायला लागले तर कुणाचाच कुणाला त्रास होणार नाही. सर्वच भांडण-तंटे बंद होतील. संपूर्ण विश्वातील माणसं आनंदाने-गुण्यागोविंदाने नांदतील !
तुकारामनीती हे नियमित सदर लिहिण्यामागील प्रांजळ-प्रामाणिक उद्देश हाच आहे की; लोककवी, महान तत्वचिंतक श्री संत तुकोबाराय हे कोणत्याही विशिष्ठ वर्ग-वर्ण अथवा रंगासाठी लिहित नसून ते संपूर्ण मानवांचे सर्वार्थाने कल्याण व्हावे आणि प्रत्येक माणूस हा विचारशील व्हावा यासाठी लिहितात ! त्यासाठी आपण सर्वांनी तुकोबांचे अभंग निट वाचले पाहिजे. त्यांनी केलेली जागृती लक्षात घेऊन आज आपण जागृत झाले पाहिजे. तुकोबा आणि त्यांचे अभंग एका कालखंडासाठी नसून त्यांचे अभंग-तत्व सदैव, अखंड ज्योतीप्रमाणे तेवते आहे ! आज सुद्धा उच्चशिक्षित माणसांना अशिक्षित तुकोबा पथदर्शी वाटतात, त्याचे कारण म्हणजे त्यांनी जगण्याचे सहज-सोपे तत्वज्ञान तुमच्या आमच्या हाती दिले आहे. तुकोबांनी त्यांच्या अगोदरचे जेवढे काही तत्त्वचिंतनात्मक ग्रंथ आहेत याचे ‘सखोल अध्ययन-अध्यापन करून आणि रोजच्या जगण्याने व्यथित झालेले त्यांचे जीवन’ असा दुग्धशर्करा योग त्यांच्या अभंगांमध्ये आहे ! आपण त्यांचे अभंग समजून-उमजून घेतले असता आपले खडतर आणि आव्हानात्मक असेलेले, असह्य जीवन सुसह्य होईल ! तुकोबांचे अभंग म्हणजे एखाद्या पांथस्थाला खूप मोठ्या वाळवंटात कुठेतरी मरुद्यान दिसावे तसे आहेत ! तेंव्हा, चला तर मग हे अभंगरुपी मरुद्यान अनुभवूयात आणि दुर्गुण टाकून सदैव सद्गुणांनीयुक्त दैनंदिन जीवन आनंदित करूयात ! असे झाले की; मगच खऱ्या अर्थाने हा लेखनप्रपंच फलद्रूप होईल ! जय तुकोबाराय !


प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ जि.परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या  माहूर तालुकाप्रमुख पदी जितू चोले यांची निवड  शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या  माहूर तालुकाप्रमुख पदी जितू चोले यांची निवड 
आधुनिक केसरी न्यूज लक्ष्मीकांत मुंडे  श्रीक्षेत्र माहूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड...
CM Devendra Fadnavis : वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी..!
उस्माननगर  पोलीसांनी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा अडीच  महिन्यानंतर शोध घेवुन आरोपीस केली अटक 
Breaking News...आ.मंजुळा गावितांचे अनेक तासांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर ठिय्या आंदोलन,नवीन अजेंडा काढण्याची मागणी
राज्य कर्जबाजारी झालं असताना चांदीच्या ताटात जेवणावळी का झोडल्या जात आहेत?
आणीबाणीला RSS सरसंघचालक बाळासाहेब देवरसांचे समर्थन, देवरसांची भूमिका भाजपाला मान्य नाही का?: हर्षवर्धन सपकाळ.
माजी आ.रोहिदास चव्हाणांनी केली अपघातग्रस्तांना मदत