आवरूनि मना बंद द्यावा ! तुकाराम नीती : भाग (१)
– प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभायेकै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठजि. परभणी (महाराष्ट्र)मो. 9158064068(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.) महाकवी तुकोबा माझा श्वास, जीव की प्राण आहेत ! परंतु कोणत्याही महापुरुषाचे दैवतीकरण झाले; की त्या महापुरुषाकडे सामान्य लोक माणूस म्हणून न पाहता देव म्हणून पाहतात आणि इथच मोठी गोची होऊन बसते. अशा महापुरुषांचे सदसद्विवेकबुद्धीने, प्रज्ञाचक्षुतून… Continue reading आवरूनि मना बंद द्यावा ! तुकाराम नीती : भाग (१)
– प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)


महाकवी तुकोबा माझा श्वास, जीव की प्राण आहेत ! परंतु कोणत्याही महापुरुषाचे दैवतीकरण झाले; की त्या महापुरुषाकडे सामान्य लोक माणूस म्हणून न पाहता देव म्हणून पाहतात आणि इथच मोठी गोची होऊन बसते. अशा महापुरुषांचे सदसद्विवेकबुद्धीने, प्रज्ञाचक्षुतून अवलोकन केले म्हणजे हे महापुरुष अगोदर सामान्य माणसंच होती परंतु अत्यंत खडतर परिस्थितीला सामोरे जाऊन, अभ्यासाने तावून-सुलाखून ही सामान्य माणसं असामान्य पदाला जाऊन पोहचली याचा विचार होणे नितांत गरजेचे वाटते. लोककवी तुकोबांचे जीवन, आणि अनुभूतीपूर्ण उपदेश-अभंग या संबंधाने "तुकाराम नीति" हे नियमित सदर-लेखन चालू करतांना मला अति आनंद होत आहे. तुकारामांना संत, भक्त, भजन-कीर्तनकार या एकाच परीपेक्षातून पाहणे म्हणजे त्यांचा विचार आणि नीती यांवर एक विशिष्ट शिक्का मारल्यासारखे होईल. कोणताही लेखक, कवी, विचारवंत अभिव्यक्त होतांना फक्त एकाच अंगाने अथवा दृष्टीकोनातून व्यक्त होत नसतो. तसे पहिले तर अनेक विद्वान अभ्यासकांच्या मते तुकारामांनी आठ हजाराच्यापेक्षाही जास्त अभंग लिहले असावेत, परंतु तत्कालीन धर्ममार्तंडांनी ते इंद्रायणीत बुडविल्यामुळे जेवढे तुकोबा, त्यांचा भाऊ, पत्नी, मुलं, सामान्य लोक आणि श्रोत्यांना पाठांतर होते तेव्हढेच जगनाडे बुवांनी तुकोबांच्या उपोषणाच्या तेरा दिवसांत लिहून काढले आणि बाकीचे कमी अधिक चार हजार अभंग नामशेष झाले असावेत. त्याच अनुषंगाने तुकारामांचे जवळपास पावणेपाच हजार अभंगांचे सिंहावलोकन केले असता बहुतांश अभंग ज्ञान, नाम, भक्ती, कीर्तन, वैराग्य, पंढरपूर, संत महिमा या विषयाच्या अनुषंगाने असले तरी, त्याच अभंगात त्यांनी जीवनाचे परखड तत्व आणि नीती सांगितली आहे हे ही दुर्लक्षित करून चालणार नाही. तुकारामांचे अति दैवतीकरण करणे म्हणजे त्यांचा परखड आणि लोकोद्धारक विचार आणि नीतीची प्रतारणा करणे होय. तुकोबांना एक समाजसुधारक लेखक, कवी, प्रबोधनकार या नजरेतून सुद्धा पाहणे आज काळाची गरज बनली आहे. तुकाराम हे काही सरळ बटन दाबल्यासारखे संत पदाला जाऊन पोहचले नाहीत. ते काही लगेच भजन-कीर्तनकार झाले नाहीत किंवा त्यांना लगेच जीवनातील सर्व अनुभूती येऊन ते एव्हढे मोठे जगण्याचे नितीतत्व सांगू अथवा लिहू शकले नाहीत याचा सुद्धा आपण प्रकर्षाने विचार करणे क्रमप्राप्त ठरते. अत्यंत खडतर काळ आणि संकटावर संकटांचे आघात तुकारामांवर झाले. त्यांची संसारात "काय करावे (?) आणि कुठे जावे (?), काय खावे (?)" अशी अगदी विमनस्क अवस्था झाली तेंव्हा ते भक्ती, भजन, कीर्तन याकडे वळले. याचे वर्णन स्वतः तुकाराम त्यांच्याच खालील अभंगात करतात.
याती शूद्र वंश केला बेवसाव । आदि तो हा देव कुळपूज्य ॥ १ ॥ ( शासकीय प्रत अ.क्र. १३३३)
हा वीस चरणांचा संपूर्ण अभंग पहिला असता त्यांच्याच अभंगातून त्याची सुरवातीची भजन-कीर्तन अवस्था आणि जीवनातील कठीण प्रसंगी त्यांची झालेली ओढाताण वाचकांच्या सहज समोर येते.
आरंभी कीर्तन करी एकादशी । नव्हतें अभ्यासी चित्त आधी ॥ ६ ॥
कांहि पाठ केली संतांची उत्तरें । विश्वासें आदरें करोनियां ॥ ७ ॥
गाती पुढें त्यांचे धरावे धृवपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥ ८ ॥
सुज्ञ वाचक आणि अभ्यासक यांना या तीन चरणांचा अभ्यास केला असता अगदी तुमच्या-माझ्यासारखीच तुकारामांची सुरुवातीची अवस्था डोळ्यांसमोर येते. म्हणजेच अभ्यासाकडे लक्ष नसणे, विश्वास आहे परंतु पाठांतर नसणे, आणि पुढे गाणाऱ्याच्या मागे मागे म्हणणे ही कुणाचीही सुरुवातीची अवस्था असते तिचं अवस्था तुकारामांचीही होती.
आज त्यांच्या अभंगांचे सिंहावलोकन केले असता त्यांची नीती आणि तत्वपूर्ण बैठक आपल्याला दिसते. तुकोबा काही सरळ अभ्यास आणि चिंतन-मनन न करता कीर्तनाला उभे राहिले नाहीत हे त्यांच्या अनेक अभंगातील दृष्टांत, संदर्भ आणि त्याआधारे मांडलेले सिद्धांत यावरून लक्षात येते. त्यांच्या अभंगाचे सहज वाचन केले असता त्यांनी श्रीमद् भगवतगीता, संपूर्ण दर्शने, सर्व शास्त्रे, पुराणें, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, तसेच अगोदरच्या आणि समकालीन सर्व संतांचे वाङ्मय फक्त वाचूनच काढले नाही तर त्या सर्व ग्रंथांचे सखोल चिंतन-मनन केलेले आढळून येते. त्यानंतर त्यांनी आपल्या अभंगातून सामाजिक समता, मानवकल्याण, विश्वविचार, नितीमत्ता, मानवी जीवनात मनाचे अनन्यसाधारण अधिष्ठान, भक्तीचा खरा अन्वयार्थ, समाजमन, जीवनाचे महत्वपूर्ण तत्वज्ञान इत्यादी विषय मोठ्या आपुलकीने आणि विस्ताराने मांडले आहेत. त्यामुळेच की काय, चारशेपेक्षा जास्त वर्षे उलटूनही लोककवी तुकोबांचे वाङ्मय नित्य-नूतन आणि जणूकाही आजच एखाद्या प्रगल्भ कवीने जीवनानुभव लिहून मिडीयावर ताजेताजे व्हायरल केले आहे असे वाटते.
तुकोबाराय आपले अनुभूतीपूर्ण जीवननिती सांगतांना माणसाचे व्यवहार आणि त्याचे वागणे कसे असले पाहिजे याचे प्रतिपादन या अभंगात करतात.
आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥
भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥
तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥ (शास. प्रत अ.क्र. २७)
अभंगाचे बारकाईने चिंतन केले असता अत्यंत महत्वाचे जीवन तत्वज्ञान तुकोबा सांगून जातात. इथे तुकोबा समाजाला कोणती मानसं आवडतात (?) याचे प्रतिपादन करतात. जी माणसं अंतर्बाह्य शुद्ध असतात तीच मानसं सर्वांना आवडतात. हाच विचार श्रीमद्भगवतगीतेच्या अठराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात.
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ (श्रीमद् भगवतगीता १८-५३)
एवढेच नाही तर याच आशयाचे संस्कृत वचन संवाद कक्षा कौमुदी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात सापडते.
एकेन राजहंसेन या शोभा सरसो भवेत्
न सा बकसहस्त्रेण परितस्तीरवासिना ॥ (संवाद कक्षा कौमुदी १.१)
या वचनांचे सिंहावलोकन केले असता तुकोबाराय हे केवळ भजन, कीर्तन, देवदेव करणारे नव्हते तर ते सर्व धर्मग्रंथांचे सखोल अभ्यासक, त्या ग्रंथातील महान वचनांचा खोलवर प्रभाव त्यांच्या मन आणि मस्तीष्कावर झाल्यामुळे ते एक नवा विचार जगाला देऊ शकले. याच अभंगात ते, आम्ही कुणालाही भीती दाखवण्यासाठी जीवन व्यतीत करत नसून स्वतःच्या मनाला अवर घालून त्याला योग्य मार्गाने लावणे हेच आमचे आद्य कर्तव्य आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात “तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची” हे महान जीवनतत्व सांगतात. अगदी त्यांच्याच अभंगात सांगायचे झाले तर “आधी केले मग सांगितले” या मताप्रमाणे त्यांनी अगोदर प्रचंड अभ्यास केला आणि नंतर ह्या महान जीवन तत्वांनीयुक्त अभंगरचना सहजतेने लोकाभिमुख झाल्या.
तेंव्हा “तुकाराम नीती” हे सदर हाती देतांना तुकोबा हे एक महान संत होतेच यात तिळमात्र शंका नाही, परंतु त्यांना केवळ तेव्हढाच शिक्का मारून त्यांच्या महान तत्व आणि विचारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुकोबाराय एक महान विचारवंत, तत्वज्ञ, संपूर्ण मानव जातीचे कल्याण करणारे तत्वचिंतक असून त्यांची ‘गाथा’ केवळ पोथी करून आणि बाहेरून पूजा करून चालणार नाही तर सामान्य माणसापासून ते महान विचारवंतांपर्यंत त्याचे नित्य वाचन व्हावे. त्यातील नीती-तत्वे काटेकोरपणे आचरणात आणल्यास संपूर्ण समाज सक्षम विचारांनी समृद्ध होऊन अनावश्यक गोष्टी जसे अज्ञान, द्वेष, मत्सर, असूया ह्या समाजातून बाहेर जातील आणि त्याऐवजी तिथे आनंद, सदाचार, एकोपा, सहाय्यक वृत्ती आणि जात-धर्म-पंथ यापलीकडे जाऊन वैश्विक विचार करण्याची प्रवृत्ती वृद्धिंगत होईल. हे होणे म्हणजेच संत अपेक्षेप्रमाणे संपूर्ण जग निर्मळ, आनंदी होईल, जे जगातील सर्वच धर्मातील संत, तत्वज्ञ, विचारवंत यांना अपेक्षित आहे. धन्यवाद!
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List