चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून भाजपामध्ये घमासान तर काँग्रेसमध्ये शीतयुद्धाचे पडसाद,निष्ठावंतांना डावलले, आयारामांचे स्वागत
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : दि. ३०/१२/२०२५ चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांना ताटकळत ठेवत सर्वच मोठ्या पक्षांनी अनेक ठिकाणी निष्ठावंतांचे स्वप्न उध्वस्त केले तर आयारामांसाठी मात्र रेड कार्पेट टाकत गळ्यात पुष्पहारांच्या माळा घातल्या. यामुळे चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये नेमक्या कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल याकडे आता समस्त चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे. महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बराच कालावधी मिळाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, शिवसेना, उबाठा, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच मोठ्या राजकीय पक्षांनी उमेदवारी वाटपामध्ये शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या निष्ठावंत उमेदवारांना ताटकळत ठेवले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पाहायला मिळते आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी वाटपावरून भाजपामध्ये प्रचंड घमासान पाहायला मिळाले तर काँग्रेसमध्ये शीतयुद्धाचे पडसाद उमटलेले दिसले.
भारतीय जनता पार्टीमध्ये भाजपा शिवसेना युतीच्या पार्श्वभूमीवर नऊ जागा शिवसेनेला, तर आरपीआय गटाला एक सीट देण्यात आली. उर्वरित 56 जागांवर भाजपाने उमेदवारीचे वाटप करत असताना 2017 च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या जवळपास आठ नगरसेवक / नगरसेविकांना उमेदवारी दिली नाही. तर त्या ठिकाणी नवीन चेहरे देण्यात आलेले आहेत. आमदार किशोर जोरगेवार अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत असताना यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी ही निवडणूक लढली होती. परंतु आता मात्र आमदार किशोर जोरगेवार हे भाजपाचे आमदार आहेत. परिणामतः यंग चांदा ब्रिगेडचे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे यंग चांदा ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांना डावलण्यात आल्याचे दुःख अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या स्वरूपात दिसत होते. तर प्रभाग क्रमांक एक मध्ये नागरिकांच्या समस्येला सातत्याने धावून जाणाऱ्या शीलाताई चव्हाण यांना उमेदवारी नाकारात पक्षाशी कुठलाही दुरानवयाने संबंध नसलेल्या महिला उमेदवाराला तुकुम प्रभाग क्रमांक एक मध्ये उमेदवारी देण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक एन.डी. हॉटेलमध्ये मुख्य निवडणूक निरीक्षक आमदार चैनसुख संचेती, निवडणूक प्रभारी माजी खासदार अशोक नेते, आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज उमेदवारी वाटप करण्यात आली. इच्छुक उमेदवारांची प्रचंड गर्दी यावेळी पाहायला मिळाली. अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्यामुळे या ठिकाणी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते तर उमेदवारी न मिळाल्याने काहींनी चांगलाच गोंधळ घातला. दुसरीकडे काँग्रेसमध्ये मनपा उमेदवार वाटप कार्यक्रमांमध्ये धानोरकर वडेट्टीवार यांच्यातील शीतयुद्धाचे पडसाद पाहायला मिळाले. आज खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी वाटपामध्ये आपले वर्चस्व दाखवत वडेट्टीवारांना घरी जाऊन झोपण्यास भाग पाडले. विद्यमान शहर अध्यक्ष नंदू नागरकर, पाच वेळा नगरसेविका राहिलेल्या सुनिता लोढिया, 2017 च्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतांनी निवडणूक जिंकणारे माजी शहर अध्यक्ष नंदू नागरकर, प्रशांत दानव, 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार असलेले आणि दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे प्रवीण पडवेकर, विना खनके, सकीना अन्सारी यांच्यासारख्या धुरंदर नगरसेवकांची उमेदवारी कापत त्या ठिकाणी आपल्या गटाच्या इच्छुक उमेदवारांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रामाणिकपणे केला.
खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या घरी बैठकांचे सत्र घेत उमेदवारी निश्चित केली. या उमेदवारी वाटपामध्ये वडेट्टीवार गटाला कसे डावलता येईल याची खलबते ठरली. आणि उमेदवारी वाटपाच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणापर्यंत वडेट्टीवार गटाच्या उमेदवारांना एबी फॉर्म देतो असे सांगून ताटकळत ठेवत शेवटच्या क्षणी मात्र त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात खासदार प्रतिभा धानोरकर यशस्वी ठरल्या. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपले वर्चस्व कायम राहील हे दाखविण्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कुठलीही कसर सोडली नाही.आपल्याला उमेदवारी मिळत नाही असे लक्षात आल्यानंतर काही निष्ठावंत पदाधिकारी हे काँग्रेस चे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना भेटायला गेले असता आमदार साहेब झोपलेले आहेत असा निरोप त्यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत संबंधितांना देण्यात आला. यामुळे काँग्रेसच्या निष्ठावंतांमध्ये सुद्धा प्रचंड संतापाची लाट निर्माण झालेली आहे.
एकूणच भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये निष्ठावंतांना डावलून आयारामांना संधी देत निवडणूक जिंकण्याचे मनसुबे या दोन्ही पक्षांनी ठेवलेले आहेत. त्यांच्या या मनसुब्यांना चंद्रपूरकर कसा प्रतिसाद देतात हे येणारा काळाच सांगेल. परंतु सध्यातरी निष्ठावंतांना डावल्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून अनेकांनी आपले नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत. निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतर परिस्थिती नेमकी काय राहील हे स्पष्ट होईल. तोवर मात्र निष्ठावंतांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर राग तर आयारामांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य असे एकूणच विदारक चित्र चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पहावयास मिळते आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List