सततची नापिकी आणि बँक कर्जाच्या ताणातून शेतकऱ्याची आत्महत्या
वाकुळणी (काशिगिरी तांडा) येथील शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय
आधुनिक केसरी न्यूज
सोपान कोळकर
बदनापूर : नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणाच्या मानसिक ताणाला कंटाळून वाकुळणी (काशिगिरी तांडा) येथील गोरख एकनाथ राठोड (वय ४०) यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याची हृदयद्रावक घटना १ डिसेंबर २०२५ रोजी घडली. गावाजवळील शेतात त्यांनी झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.गोरख राठोड यांच्या अवघ्या दोन एकर शेतीवरच उदरनिर्वाह चालत होता. सततच्या नापिकीमुळे उत्पन्न घटत असतानाच जालना येथील आयसीआयसीआय बँकेचे तब्बल ३ लाख २७ हजार रुपयांचे कर्ज त्यांच्या नावावर होते. कर्जफेडीचा वाढता तगादा, आर्थिक अडचणी आणि शेतीतील अनिश्चितता यामुळे ते मानसिक तणावाखाली होते, अशी प्राथमिक माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळाली.
घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी तसेच महसूल विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कर्त्या व्यक्तीच्या आकस्मिक निधनाने कुटुंब उघड्यावर पडले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत शेतकऱ्याच्या मागे पत्नी, तीन मुली आणि दोन मुलांचा असा मोठा परिवार असून त्यांच्यावर अचानक आर्थिक संकट कोसळले आहे. कुटुंबाकडे कोणताही आधार किंवा पर्याय नसल्याने त्यांचे भवितव्य प्रश्नचिन्हात आहे.
शेतकरी आत्महत्यांच्या घटना थांबवण्यासाठी आणि पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे.दरम्यान स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी संघटनांनी प्रशासनाने तातडीने राठोड कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
"शेतकऱ्याची आत्महत्या हि खूपच दुःखद घटना आहे. आम्ही शासनस्तरावर पंचनामा केला असून याबाबत वरिष्ठांना लवकरच अहवाल पाठविण्यात येणार आहे. शासकीय नियमानुसार योग्य ती मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोणत्याही शेतकऱ्याने असे टोकाचे पाऊल उचलू नये अशी आम्ही विनंती करत आहोत."
श्रीमती तेजस्विनी जाधव, तहसीलदार बदनापूर.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List