कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
तब्बल 400 मिली विषारी औषध प्राशन करून संपवली जिवनयात्रा
आधुनिक केसरी न्यूज
बजरंगसिंह हजारी
माहूर : दि.१२ मे तालुक्यातील वाई बाजार येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीला कंटाळून तब्बल चारशे मिली विष प्राशन करून आपली जिवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना दि.११ मे रोजी उघडकीस आली आहे.नुकतीच 09 मे रोजी माहूर येथील उबाठा सेनेचे शहर प्रमुख निरधारी जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ताजी असतानाच वाई बाजार येथील या आत्महत्येच्या सलग दुसऱ्या घटनेने संपुर्ण तालुक्यात दुःखाचे सावट पसरले असून, नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. शिंदे कुटुंबातील घरचा कर्ता पुरुष निघून गेल्याने पिडीत शेतकरी कुटुंबाला शासनााने तातडीची मदत देण्याची मागणी परिसरातून होत आहे.
माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील अल्पभूधारक शेतकरी राजू उर्फ आतिष वामनराव शिंदे वय 44 वर्ष, धंदा शेती या अल्पभूधारक शेतकऱ्याकडे दोघां भावात मिळून फक्त 41 आर अशी सामाईक शेती आहे. त्याच शेतीच्या आधारे ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. तथापि आजच्या या प्रचंड महागाईच्या काळात आपल्या अल्पशा शेतीतील तोकड्या उत्पन्नाच्या भरवश्यावर कुटुंबाचे रहाटगाडगे चालवताना नाईलाजास्तव खाजगी सावकारीचे प्रचंड कर्ज झाले असल्याचे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान शनिवार दि.१० मे रोजी बाहेरगावच्या एका लग्नसमारंभाला जाऊन येतो असे सांगून बाहेर गेलेल्या राजु शिंदे यांनी दुपारी सव्वाबारानंतर कुणाचाही कॉल घेतला नसल्यामुळे घरची मंडळी चिंताग्रस्त होऊन मनात शंकेची पाल चुकचुकल्याने त्यांनी सगळीकडे शोधाशोध करूनही राजु यांचा कुठेही काहीही ठावठिकाणा लागत नव्हता.दरम्यान रविवारी दि.११ मे रोजी सकाळी वाई बाजार नजिकच्या वाघाई टेकडी परिसरात त्यांचा मृतदेह आढळला असून त्यांच्या मृतदेहाशेजारी 'मोनोसील' नामक 500 मिलीच्या विषाची बाटली आढळून आली. त्यातील तब्बल 350 ते 400 मिली विषारी औषध शिंदे यांनी प्राशन केल्याचे प्रथमत: दिसून येेत असून घटनेची माहीती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांच्यासह पो.हे.काँ. पठाण व पो. काँ. संजय शेंंडे यांनी घटनास्थळावर धाव घेवून मयतास शवविच्छेदनासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आणले.दरम्यान,अत्यंत शोकाकुल वातावरणात दुपारी मयत शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अल्पभूधारक शेतकऱ्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता शासनाने पिडीत कुटुंबाला तातडीने मदत द्यावी अशी भावना उपस्थितांसह परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List