25 वर्षाची प्रतिक्षा संपणार:बालाजी सहकारी साखर कारखान्याचे चाक पुन्हा फिरणार ? एमएससी बँकडून निविदा सूचना जारी
आधुनिक केसरी न्यूज
अरविंद देशमुख
रिसोड : तालुक्यातील मसलापेण येथे उभा असलेला बालाजी सहकारी साखर कारखाना गेल्या जवळपास २५ वर्षापासून धूळखात पडून आहे. मात्र एमएससी बँकेने न्यायालयातील दावा क्रमांक ९७०३/२०१०च्या निर्णयास अधिन राहुन सदर कारखाना भाड्याने अथवा विक्रीसाठी निविदा सूचना जारी केली आहे. परिणामी बालाजी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होण्याच्या चर्चेला उधाण आले असून, त्याअनुषंगाने कारखान्याचे चाक पुन्हा फिरणार? हा उत्कंठादायक प्रश्न जानेवारी २०२४ च्या अखेरीस सुटणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील मसलापेण ( केशव नगर ) येथे असलेला बालाजी सहकारी साखर कारखाना केवळ गटबाजीतून निर्माण झालेल्या अनास्थेपोटी गेल्या २५ वर्षापासून धूळखात पडून आहे. सन १९८९ मधे योजनामहर्षी स्व. बाबासाहेब धाबेकर यांच्या नेतृत्वात कारखान्याचा पहिला गळीप हंगाम सुरू झाला होता. कारखान्याची प्रगती पाहता, अवघ्या एक वर्षातच येथील कामगारांना वेतन आयोग लागू झाला होता. एव्हढेच नव्हे; तर १२५०० टन दररोजची गाळप क्षमता असलेल्या या कारखान्याने १९९१/९२ सालात तब्बल तीन लाख ६१ हजार टणाची गाळप करून संपुर्ण महाराष्ट्रात बालाजी सहकारी साखर कारखाना नावलौकिकास आला होता. याची दखल घेत राष्ट्रपती पुरस्काराने कारखान्यास गौरविण्यात सुद्धा आले होते. मात्र एखाद्या चांगल्या गोष्टीला दृष्ट लागावी तशी गत बालाजी कारखान्याची झाली. संचालक मंडळ आणि कामगार यांच्यात सुद्धा सरळ सरळ दोन गट पडले आणि कारखान्याची अधोगती सुरू झाली ती आजतागायत कायम आहे.
२५ वर्षापूर्वी सुजलाम् सुफलाम् अवस्थेत असलेल्या बालाजी सहकारी साखर कारखान्यामुळे परिक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. तेंव्हा सध्यस्थितीत असलेल्या सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे कारखान्याला जवळपास २५० की.मी. अंतरावरून बाहेरचा ऊस आणावा लागत होता. आज कारखाना क्षेत्रात जवळपास नव्वद टक्के सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे त्यामुळे आपसुकच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या चौपट वाढणार असल्याचे तज्ञ शेतकरी बोलत आहेत. सोयाबीन,तूर, हरभरा या पारंपारिक पिकांना नैसर्गीक संकटांचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.त्यामुळे ऊस हे हमी व नगद पीक असल्याने बालाजी कारखाना सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. एमएससी बँकेने जारी केलेल्या निविदा सूचनेनुसार २७ डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ पर्यंत निविदा फॉर्म विक्री होणार आहे.तर इच्छुकांसाठी ११ ते १२ जानेवारी रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मालमत्ता पाहणी कार्यक्रम पार पडणार आहे. एकंदरीत परिस्थीती पाहता बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला असल्याचे स्पष्ट होत आहे. सदर कारखाना कोणी विकत घेवो अथवा भाडे तत्वावर चालविण्यास घेवो..! मात्र २५ वर्षाच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर बालाजी सहकारी साखर कारखान्याचे चाक पुन्हा फिरणार ? हा प्रश्न सध्यस्थितीत रिसोड, मालेगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या उत्कंठेने विचारत आहेत. त्याचे उत्तर जानेवारीच्या अखेरीस स्पष्ट होणार असल्याचे देखील काही माहितगार यांच्याकडून कळले आहे.
शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय...
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बालाजी सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांसाठी हा प्रश्न प्रतिष्ठेचा समजला जाणारा आहे. साखर कारखाना सुरू होणे हा शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. या बाबत स्थानिक नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,आ. रिसोडचे आ. अमित झनक हे बाहेरगावी असल्यामूळे कव्हरेज अभावी त्यांच्या पर्यंत आवाज पोहचू शकला नाही.तर माजी आ. विजयराव जाधव यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. मात्र या बाबत शेकडो शेतकरी व्यक्त झाले असून, त्यासर्वांनी कुठल्याही परिस्थितीत बालाजी साखर कारखाना सुरू व्हावा..! अश्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. तीच परिस्थीती परिसरातील साखर कामगारांची सुद्धा आहे.
पाठपुरावा करणे सुरूच...
"माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचे स्वियसहाय्यक यांच्याकडून माहिती मिळाली आहे की, शेतकऱ्यांच्या हितासाठी बालाजी साखर कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी मा.खा. अनंतराव देशमुख यांनी वेळोवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे व अजूनही पाठपुरावा करणे सुरूच आहे..!
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List