काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी?
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलीस पाळत ठेवत आहेत. मुंबईतील नाना चौकातील सर्वोदय आश्रमात सपकाळ यांचा मुक्काम असतो, त्या आश्रमात पोलीस सातत्याने पाळत ठेवत आहेत. आज सकाळी एका साध्या वेशातील पोलिसांने थेट बेडरुममध्ये घुसून टेहळणी आणि चौकशी केली. हे आतापर्यंत तिस-यांदा घडले आहे. कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे?, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सकाळी एक पोलीस थेट बेडरूमध्ये घुसून टेहळणी करत होता, तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहात का? पत्रकार आले आहेत का ?, यासह अनेक प्रश्न विचारले. तुम्ही बेडरुममध्ये प्रवेश का केला, कोणाचे आदेश आहेत, असे विचारले असता, वरिष्ठांचे आदेश आहेत असे म्हणत वरिष्ठांना फोनवर बोला असे सांगितले. अशा पद्धतीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे. यामागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांवर पाळत ठेवण्याची भाजपाची प्रवृत्ती आहे, आधी पेगॅसेस नंतर फोन टॅपिंग केले. आता थेट बेडरुमपर्यंत ते पोहचले आहेत परंतु अशा दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
मुंबईतील एन्काऊंटरवर अनेक प्रश्न...    
पवईत काल पोलिसांनी रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीचे एन्काऊंटर केले. या व्यक्तीने लहान मुलांना ओलीस ठेवले होते हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, मुलांची सुटका महत्वाची होती पण हे संपूर्ण प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या वेळी एनएसजीचे पथक उपस्थित असताना पोलिसांनी गोळ्या झाडून त्याची हत्या करण्याचे कारण काय. तो व्यक्ती मनोरुग्ण आहे असे सांगतिले जात आहे पण याच व्यक्तीने सुंदर माझी शाळा सारखे सरकारी उपक्रम राबिवले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर तो उपस्थित होता. या घटनेची चौकशी झाली पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
गुन्हेगारांचा आका देवेंद्र फडणवीस...
डॉक्टर संपदा मुंडे यांना दबावामुळे आत्महत्या करावी लागली, ही आत्महत्या नसून हत्याच आहे. या प्रकरणी भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव घेतले जात आहे. निंबाळकर यांना अनेकांना त्रास दिला आहे, त्यांचा अपहरण, खंडणी, मारहाण यासारख्या गंभीर गुन्ह्यात हात असूनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चौकशी न करता त्यांना क्लिन चिट देऊन टाकली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्याच्या एका फुल व्रिकेत्यानेही भाजपाच्या पाच पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवून आपल्याला आत्महत्या का करावी लागत आहे हे सांगितले आहे. पोलिस सामान्य जनतेच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत.सत्ताधारीच गुंडगिरी करत असल्याने कारवाई होत नाही. फडणवीस यांच्या काळात राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळली असून यात भाजपाचे नेते पदाधिकारी यांची गुंडगिरी वाढली आहे. या सर्वांना फडणविसच जबाबदार असून फडणवीस गुन्हेगारांचे आका आहेत असे सपकाळ म्हणाले.
शिवसेना, भाजपाच्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश...
अकोला जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय मालोकार यांनाही काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यांनी तीनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली असून शासनाच्या विविध समित्यांवरही काम केले आहे. यासोबतच शिवसेना (उबाठा) चे सहसंपर्क प्रमुख व हिंगोली जिल्ह्यातील नेते डॉ. रमेश शिंदे पाटील यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, युवासेना, भाजपा, शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनाही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापूर्वीच मोठा पक्ष प्रवेश झाला. त्यांनतर जालना जिल्ह्यात व नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे विविध पक्षातून नेते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षात आणखी महत्वाचे नेते लवकरच प्रवेश करणार आहेत.
निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चात काँग्रेस 
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या विरोधात १ नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा आयोजित केला आहे. मतदार याद्यामधील घोटाळे हा गंभीर व चिंतेचा विषय असून राहुल गांधी यांनी या प्रश्नाला सर्वाच आधी वाचा फोडली व पुराव्यासह गडबड घोटाळे उघड केले. निवडणुका या निष्पक्ष व पारदर्शकपद्धतीने झाल्या पाहिजेत ही सर्वांची मागणी आहे. या मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून मोर्चात काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत   आदी उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



 
                  
          
          
          
          
                 
                 
                 
                 
                 
                 
               
Comment List