...नंतरच सरकाररूपी व्यवस्थेला जाब विचारा ; वसंत मुंडे यांचा पत्रकारांना सल्ला; एकच स्तंभ सोयी-सवलतींपासून वंचित का?
आधुनिक केसरी न्यूज
कोल्हापूर : सरकारच्या विविध सोयी-सवलतींचा लाभ आपल्याला का मिळत नाही, हे पत्रकारांनी आधी स्वतःला विचारावे. त्यानंतरच सरकाररूपी व्यवस्थेला जाब विचारावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे ह्यांनी आज केले. प्रसारमाध्यमांना सोयींपासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला त्यांनी धारेवर धरले.
पत्रकारांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचे उद्दिष्ट ठेवून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने दीक्षाभूमी (नागपूर) ते मंत्रालय (मुंबई) पत्रकार संवाद यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा आज दक्षिण महाराष्ट्रात पोहोचली.
करवीरनगरीतील पत्रकारांशी श्री. मुंडे ह्यांनी संवाद साधला. पत्रकार बैठकीस संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा समन्वयक तानाजी पवार, तालुकाध्यक्ष आनंद वायदंडे (करवीर), उत्तम पाटील (शाहूवाडी), रूपेश डोंगरे, शिवाजी पाटील (राधानगरी), बाबासाहेब चिपडे आदी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी गृहे (संसद व विधिमंडळ), न्यायपालिका, प्रशासन आणि माध्यमे हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत, असे नेहमी सांगितले जाते. त्यातील एकच स्तंभ सोयी-सवलतींपासून वंचित का, असा रोकडा सवाल विचारून श्री. मुंडे म्हणाले की, प्रसारमाध्यमांना काय सवलती आहेत, हे सरकारने सांगावेच.
पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, पत्रकार सन्मान निधी योजना प्रभावीपणे ज्येष्ठ पत्रकारांपर्यंत पोहोचणे, पत्र आरोग्यविमा, अधिस्वीकृतीपत्रिका मिळण्यात अडथळे असे पत्रकारांचे असंख्य प्रश्न आहेत. समाजव्यवस्थेचे ओझे वाहून वाहून पत्रकारमंडळी विविध व्याधींनी जर्जर झाली आहेत. त्यांचे आयुष्यमानही कमी झाले आहे, अशी व्यथा व्यक्त करून श्री. मुंडे म्हणाले, ‘‘वयाची साठी ओलांडल्यावर कोणी काम देत नाही. सरकार ज्याला सन्माननिधी म्हणते, ते पेन्शन मिळत नाही. मग त्या पत्रकाराने आणि त्याच्या कुटुंबाने जगायचे कसे?’’
आपल्या अडचणी आणि आपल्यासमोरच प्रश्न ह्यांबद्दल जागरूक झाले पाहिजे. त्या जाहीरपणे मांडल्या पाहिजते आणि हे प्रश्न का सुटत नाहीत, ह्याबद्दल सरकारला जाब विचारला पाहिजे. ते करण्यासाठीच महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांनी येत्या मंगळवारी (दि. २० ऑगस्ट) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार संवाद यात्रेच्या समारोपासाठी उपस्थित राहावे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सरकारचे लक्ष वेधावे, असे आवाहन श्री. मुंडे ह्यांनी केले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List