विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिजवणाऱ्यांची वेळ व मानधन निश्चित
आधुनिक केसरी न्यूज
निफाड :- शासन निर्णयानुसार स्वयंपाकी तथा मदतनिसांनी प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गतची सर्व कामे करणे आवश्यक आहेत, पोषण आहाराचे काम संपल्यानंतर त्यांना विनाकारण शाळेत थांबवून ठेवण्यात येऊ नये, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत. या निर्णयामुळे स्वयंपाकी तथा मदतनीस महिलांना दिलासा मिळाला आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये मानधन तत्त्वावर स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहेत. सदर स्वयंपाकी तथा मदतनिसांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते. त्यांना शासनाकडून दरमहा अडीच हजार रुपये मानधन देण्यात येते, २०११ च्या शासन निर्णयामध्ये मदतनिसांच्या कामकाजामध्ये शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे ही बाब नमूद आहे. याबाबत मदतनीस संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती, या शिवाय योजनेव्यतिरिक्त अन्य कामे न देणे व विनाकारण कामावरून काढून टाकू नये अशी मागणी स्वयंपाकी तथा मदतनिसाच्या संघटनेने केली होती. त्यानुसार सोमवारी शासनाने स्वयंपाकी तथा मदतनीसांच्या कामकाजाबाबत सुधारित निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार स्वयंपाकी, मदतनिसांना त्यांच्या दैनंदिन कामकाजाची मर्यादा चार तासांची करण्यात आली आहे. या चार तासांत स्वयंपाकी, मदतनिसांनी शासन निर्णयानुसार विहित करून दिलेली सर्व कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. दि. ८ जानेवारीच्या शासन आदेशानुसार या मदतनिसांना पोषण आहार योजनेंतर्गतची सर्व कामे करणे आवश्यक आहे.
मदतनिसांची कामे
पाक कृतीनुसार विहित वेळेत आहार शिजवणे, तांदूळ व धान्याची साफसफाई करणे, शाळेत विद्यार्थ्यांना जेवणाच्या जागेवर आहार वाटप करणे, विद्यार्थ्यांच्या आहार सेवनानंतर जेवणाची जागा, स्वयंपाकगृहाची साफसफाई करून सांडलेल्या जेवणाची विल्हेवाट लावणे, पोषण आहारासाठी आवश्यक पाणी भरणे तसेच जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे, शाळास्तरावरील परसबागेची निर्मिती व देखभा- लीसाठी सहकार्य, अन्न शिजवताना वापरलेल्या भाजीपाल्याची नोंदी ठेवणे आदी कामे त्यांच्याकडे सोपविली आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List