शरद पवारांनी दिले 'हे' ओपन चॅलेंज....तुम्हाला सोडणार नाही...!
आधुनिक केसरी न्यूज
अहमदनगर : राजकीय पक्ष म्हणून आम्ही एकमेकांवर टीका करतो. पण टीका करताना आम्ही मर्यादा ठेवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्याबाबतीत काय बोलले? की भटकती आत्मा. माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला की, हा भटकता आत्मा आहे. एका दृष्टीने हे बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे,असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) येथील आयोजित कार्यक्रमातून केला आहे.
शरद पवार साहेब म्हणाले की, मोदींनी शिवसेनाबाबत उल्लेख केला की बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली. त्यांनी राज्य केलं. मराठी माणासाचा आत्मविश्वास वाढला. त्यांचा उल्लेख करताना ही नकली बापाची संघटना? हे बोलणं काही शोभतं? एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यक्तीला आणि व्यक्ती समूहाला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे पंतप्रधानांनी बोलायचं? याचा अर्थ हा आहे की त्यांना तारतम्य राहिलेलं नाही. सत्ता हातात येते त्या सत्तेचं समर्थन करणं त्यामुळे सत्ता मिळायची शक्यता नसली तर माणूस बेफान आणि अस्वस्थ कसा होतो त्याप्रकारची स्थिती झाली आहे असे शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.
पुढे शरद पवार साहेब म्हणाले की, निवडणुका येतील. त्या निवडणुकीला आपण सामोरं जाऊ. लोकांना बरोबर घेऊ. त्यांना आत्मविश्वास देऊ आणि मनापासून त्यांची सेवा करण्याचं वचन त्यांना देऊ. त्यातून आपल्याला पुढे जायचं आहे. सुदैवाने या देशाचे लोक मोदी सारख्यांनी प्रश्न जे काढले त्या प्रश्नांना फारसं लोक महत्त्व देत नाहीत. निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा लोकांची चर्चा होती की राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल. आज काय दिसतंय? मंदिर बांधलं. आनंद आहे. उद्या मी अयोध्येला गेलो तर मंदिरात जाईल. त्या ठिकाणी रामांचा सन्मान ठेवेन. पण राजकारणासाठी मी कधी त्याचा वापर करणार नाही. ते चुकीचं काम मोदींनी केलं. त्याची नोंदी अयोध्येच्या जनतेने केले. राम मंदिर असलेल्या अयोध्येत मोदींच्या उमेदवाराचं शंभर टक्के पराभव अयोध्येच्या जनतेने केला. हा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. त्यामुळे आता त्यावर फारसा विचार करायचा नाही असेही शरद पवार साहेब म्हणाले.
यावर सविस्तर बोलताना शरद पवार साहेब म्हणाले की, मोदींचा प्रचार मी सांगण्याची गरज नाही. प्रधानमंत्रिपदावर बसलेली व्यक्ती निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करते. पंतप्रधान एका पक्षाचा नसतो, देशाचा असतो. त्यांनी सर्व जाती,धर्म, भाषा आणि प्रांताचा विचार करायचा असतो. हे त्यांनी मुद्दाम केलं. कारण विचारधारा त्याची तशीच आहे. आज या लोकांसाठी एक प्रकारचा विश्वास देण्याची कामगिरी राज्यकर्त्यांना करावी लागते. मोदी म्हणाले की , यांच्या हातात सत्ता गेली तर तुमचं मंगळसूत्र काढून घेतील. यापूर्वी असं कधी घडलं आहे का? मोदींनी सर्व मर्यादा पाळल्या नाहीत. असे शरद पवार साहेब म्हणाले.
शरद पवार साहेब पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनी शपथ घेतली, पण लोकांनी त्यांना सहमती दिली नव्हती. देशातील जनतेने त्यांना बहुमत दिले नाही. तेलगू देसम आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांची त्यांनी मदत घेतली त्यामुळे त्याठिकाणी त्यांचे राज्य झालं. आजचे जे सरकार आहे ते वेगळे सरकार आहे. निवडणुकीच्या काळामध्ये मोदी जाईल त्या ठिकाणी मोदी सरकार, मोदी गॅरंटी म्हणत होते. आज ती मोदी गॅरंटी राहिली नाही आज ते मोदी सरकार राहिलेले नाही. आज तुम्ही लोकांनी तुम्ही मताच्या अधिकारावर तुम्ही सांगितलं की हे मोदी सरकार नाही. तर इंडिया सरकार आहे. आपण पुढे जायचे आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यात आपल्याला सरकार आणायचे आहे. लोकांना विश्वास द्यायचा आहे, असेही शरद पवार साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
कुणी गेले तरे फरक पडणार नाही, कारण शरद पवार साहेब नावाचे विद्यापीठच- जयंत पाटील
आता अनेकजण पक्ष सोडून गेले. कुणी गेले तरे फरक पडणार नाही, कारण शरद पवार साहेब नावाचे विद्यापीठच आपल्याकडे आहे. त्यांनी अशा अनेक प्रसंगांना ते सामोरे गेले आहे. माझ्या शाळेचा हेडमास्तर खमक्या आहे. आता नव्या पिढीला उभे करण्याचे काम पवार साहेब करतील. त्यांनी १९९९ मध्ये अर्थमंत्री केले. आर. आर. पाटील, अनिल देशमुख यांच्यासारख्या अनेकांना संधी दिली. आजही त्याच मूडमध्ये पवार साहेब आहेत. लोकसभा निवडणुकीत पवारांना बारामतीतच अडकवून ठेवण्याची इच्छा दिल्लीश्वारांची होती. त्यांनी सुप्रियाताई सुळेंचा पराजय करण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. मात्र निवडणुकीत राज्यात फिरणार नाहीत, ते पवार साहेब कसले. संपूर्ण निवडणुकीत राज्यात शरद पवार साहेबांची लाट दिसून आली. त्यातूनच १० पैकी ८ जागा निवडून आल्या आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
लोकसभेमध्ये सर्वात पहिला प्रश्न दुधाच्या भावासाठी मांडण्यात येईल. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्न लोकसभेमध्ये आम्ही सर्व खासदार मांडू. कांदा प्रश्नावर मी पियुष गोयल यांना म्हटले होते की कांद्याबाबत आपण काय करणार परंतु ते म्हणाले होते की, तीन जिल्ह्यासाठी मी देशाला वेठीस धरणार नाही त्याच तीन जिल्ह्याने कांदा प्रश्नावरून मंत्र्यांचा पराभव केला. असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
मी राजकारणा व्यतिरिक्त अनेक क्षेत्रात काम करतो. पण, जेव्हा मला अडचण येते, भोवताली अंधार वाटतो, तेव्हा मी शरद पवार साहेबांचा चेहरा आठवतो आणि मला एक वेगळी उर्जा मिळते. लोकसभेला महाविकास आघाडीचा जो विजय झाला, तो इथं बसलेल्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळं आणि शरद पवार साहेबांमुळे झाला आहे. आपले दहापैकी आठ खासदार आपले निवडून आले. तर दोघे जिद्दीने लढले. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. आपला स्टाईक रेट ८ चा आहे. तर नकली राष्ट्रवादीचा स्टाईट रेट २५ टक्के आहे आणि भाजपचा स्टराईक रेट ३४ टक्के आहे. पलीकडे पैसा, सत्ता, दबावतंत्र होतं, तरीही लोकांनी त्यांना नाकारून आपल्याला पंसती दिली. हे लोकसभेचं यश मस्तकातं गेलं नाही पाहिजे. कारण, आता आपल्याला लोकांच्या हिताासाठी विधानसभाही लढायची आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार म्हणाले.
मी साहेबांना शब्द देतो नगर जिल्ह्यातील १२ च्या १२ जागी आम्ही जिंकणार. निलेश लंके जे बोलतो ते करतोच. सर्वांना माहिती आहे मी कसला पहिलवान आहे. संसदेत जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाहीतर संसेद बंद पाडेल. असे अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.
यावेळी अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २५ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह मोठ्या संख्यने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सर्व खासदारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राज्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List